वहिवाट बिकट वाट नसावी...!
By Admin | Updated: July 23, 2014 00:26 IST2014-07-22T23:36:48+5:302014-07-23T00:26:40+5:30
शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर चिखलपाण्याने स्वागत

वहिवाट बिकट वाट नसावी...!
नाशिक : ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको...’ हा अनंत फंदी यांचा फटका सर्वज्ञात आहे. परंतु वहिवाटच बिकट वाट झाली आणि त्या वाटेवर धोपट अर्थात सरळ मार्गाने जाणे मुश्कील होऊन बसले असेल, तर सामान्यांचे हाल विचारायलाच नको. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट तर लागलीच आहे, पण शासकीय-निमशासकीय कार्यालयांचा प्रवेशही चिखल-पाण्याने माखला आहे.
शहरात पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर पाण्याची डबकी साचली आहेत, तर काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांची दयनीय स्थिती झालेली असतानाच शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्येही पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना कार्यालयात ये-जा करणे अवघड होऊन बसले आहे. शरणपूररोडवर पोलीस उपअधीक्षकांचा जाई बंगला आहे. या बंगल्यासमोर पावसाच्या पाण्याचे मोठे तळे साचले आहे. शरणपूररोडवरच मेळा स्थानकासमोर असलेल्या भूमिलेख कार्यालयातही चिखल झाला आहे. नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावर पाणी साचल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो आहे.
त्र्यंबकरोडवरील जलसंपदा विभागाच्या प्रवेशद्वारावर पाण्याचे तळे साचल्याने उडी मारूनच आत प्रवेश करावा लागतो. तशीच स्थिती सिंचन सेवा भवनाची आहे. मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोरही चिखलाचे साम्राज्य आहे. वनअधिकारी (पश्चिम) यांच्या कार्यालयाकडे जाणारी वाट तर बिकट बनली आहे. हुतात्मा स्मारकाच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ग्रंथालय आहे. परंतु या ठिकाणीही पाणी व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महाराष्ट्र स्वयंरोजगार प्रशिक्षण मंडळाकडे जाणारा मार्ग, तर पूर्णपणे चिखलाने माखला आहे. याठिकाणी जायचे, तर चिखलात फसण्याशिवाय पर्याय नाही. बिटको हायस्कूलशेजारी असलेल्या जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे प्रांगणातही चिखल-पाणी साचले आहे. त्यामुळे गृहरक्षक दलाच्या जवानांना रोजची परेड करणे मुश्कील बनले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, आरोग्य उपसंचालक कार्यालय, पोलीस आयुक्तालय, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव या ठिकाणीही कमी-अधिक प्रमाणात चिखल झालेला आहे. शासकीय कार्यालयांकडे जाणारी वाट बिकट बनल्याने रोज विविध कामांसाठी गाऱ्हाणे घेऊन जाणाऱ्या सामान्यांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. शासकीय कार्यालयांनी प्रवेशद्वारावर मुरूम-खडी टाकून मार्ग सरळ-सुकर बनवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)