आर्थिक सुधारांकरिता उच्चशिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आवश्यक
By Admin | Updated: December 22, 2015 23:01 IST2015-12-22T22:59:54+5:302015-12-22T23:01:11+5:30
अभय टिळक : काकाणीनगर वाचनालय ग्रंथालय सप्ताह

आर्थिक सुधारांकरिता उच्चशिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आवश्यक
मालेगाव : आर्थिक सुधारणांना आर्थिक पुनर्रचना म्हणजे जास्त संयुक्तीक असून या बदलांचा लाभ मिळवायचा असेल तर देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, शासकीय यंत्रणेला अधिक सक्षम करणे आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी होईल याकरीता उपाययोजने आवश्यक आहे, असे प्रतिपादन अर्थविश्लेषक आणि भारतीय अर्थविज्ञानवर्धिनीचे संचालक अभय टिळक यांनी येथे केले. येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत ‘आर्थिक सुधारणा: आजवरची वाटचाल आणि पुढील दिशा’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र अजय शाह होते.
आर्थिक बदलांची संभावना उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण अशी करुन टाकल्यामुळे आणि आर्थिक बाबींबाबत लोकशिक्षण करण्याची राजकीय पक्षांची अनास्था व लोकांमध्ये असणारा अर्थसाक्षरतेचा आभाव यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणावर आर्थिक बदलांबद्दल अज्ञान आहे. याबद्दल खंत व्यक्त करुन टिळक यांनी हे बदलण्याकरीता अर्थतज्ञांनी लोकांपर्यंत अर्थशास्त्र लोकभाषेत नेण्याची, माध्यमे आणि शिक्षण व्यवस्थेने अर्थसाक्षरता वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.
पंडित नेहरूजींच्या काळात नियोजन आयोगामार्फत राबविलेल्या गेलेल्या आर्थिक धोरणांमुळेच नव्वदच्या दशकातील आर्थिक सुधारणा शक्य झाल्या. त्यामुळे त्या धोरणांवर टिका करणे चुकीचे आहे. उलट देशाचा आर्थिक पाया घडविण्याचे श्रेय त्यांचे आहे, असे मत अभय टिळक यांनी व्यक्त केले. भावना भडकविणे सोपे असते पण विचार घडविणे अवघड असते आणि वाचनसंस्कृती, व्याख्यानमाला या माध्यमांतून काकाणी वाचनालय हे विचार घडविण्याचे स्तुत्य कार्य करीत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी वाचनालयाबद्दल काढले. व्याख्यानास सर्व स्तरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.