पाण्याच्या ठिकाणी असलेली अस्वच्छता
By Admin | Updated: June 11, 2014 00:20 IST2014-06-10T23:40:39+5:302014-06-11T00:20:22+5:30
पाण्याच्या ठिकाणी असलेली अस्वच्छता

पाण्याच्या ठिकाणी असलेली अस्वच्छता
नरेश हाळणोर
नाशिक
गाव तेथे रस्ता अन् रस्ता तेथे एस.टी.’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी दिले जात नसल्याची बाब ‘लोकमत’च्या पाहणीतून स्पष्ट झाली आहे. नाशिक शहरामध्ये महामंडळाचे तीन बसस्थानक असून या तीनही ठिकाणी प्रवाशांसाठीच्या पाणपोर्इंची अस्वच्छताच दिसून आली. आरोग्याबाबत शासन गंभीरतेने उपाययोजना राबवित आहे. अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात असून, ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत स्वच्छतेच्या योजनांसाठी अब्जावधी रुपयांचा खर्च केला जात असताना शासनाच्याच एका महामंडळाकडून दिसून आलेली स्वच्छतेबाबतची आणि तीही पाण्याविषयीची अनास्था चिंताजनक बाब आहे.
प्रत्येक नागरिकाला पिण्यासाठी स्वच्छ पाणीही बसस्थानकात उपलब्ध करून देण्यास महामंडळ असमर्थ ठरले आहे. तेही ज्या प्रवाशांकडून कोट्यवधींचा महसूल परिवहन महामंडळाला मिळतो, त्यांनाच नाइलाजास्तव आरोग्याला धोका निर्माण करणारे पाणी प्यावे लागत असल्याने एकप्रकारे प्रवाशांसाठी ही काळ्या पाण्याचीच शिक्षा आहे.