‘गणराया’वर विघ्न महागाईचे
By Admin | Updated: June 26, 2014 01:01 IST2014-06-26T00:58:06+5:302014-06-26T01:01:43+5:30
‘गणराया’वर विघ्न महागाईचे

‘गणराया’वर विघ्न महागाईचे
नाशिक : येत्या आॅगस्ट महिन्यात सर्वत्र साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा महागाईचे संकट असून, ‘इको फे्रण्डली’ अर्थात शाडू माती व नैसर्गिक रंगकाम केलेल्या गणेशमूर्ती खरेदी करताना नागरिकांना महागाईच्या विघ्नाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतींमध्येदेखील दहा ते पंधरा टक्क्यांनी भाववाढ होऊ शकते, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
विविध सण-उत्सव पर्यावरणपूरक साजरे केले जावे यासाठी शाळा, सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी संघटनांकडून जागर केला जातो. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दिवाळी, गणेशोत्सवासारखे सणदेखील इको फ्रेण्डली पद्धतीने साजरे करण्यावर नाशिककर भर देत आहेत. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये फटाक्यांपासून शहरात होणारे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषणाच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. गणेशोत्सवामध्येदेखील पर्यावरण संवर्धन करण्याचा नाशिककरांनी गेल्या वर्षी पुरेपूर प्रयत्न केल्याचे दान झालेल्या मूर्तींच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे गोदाप्रदूषणदेखील कमी होण्यास मदत झाली. परिणामी जलचर प्राणी, वनस्पती यांची सुरक्षितता धोक्यात आली नाही. यावर्षी गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या शाडू मातीचा वाहतुकीचा खर्च व त्यावर लागणारा सरकारी कर लक्षात घेता विक्रेत्यांकडून भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून, आठवडाभरानंतर तयार झालेल्या गणेशमूर्तींवर रंगकाम करण्यास प्रारंभ केला जाणार असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. (प्रतिनिधी)