मालेगावी मतदारांच्या संख्येत वाढ
By Admin | Updated: August 12, 2014 02:03 IST2014-08-11T21:26:10+5:302014-08-12T02:03:27+5:30
मालेगावी मतदारांच्या संख्येत वाढ

मालेगावी मतदारांच्या संख्येत वाढ
मालेगाव : लोकसभा निवडणुकीनंतर मतदार नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असली मतदारांचा नाव नोंदणीसाठी उत्साह नसल्याने फेरमतदान नोंदणीत केवळ तीन टक्के मतदारांची वाढ झाली आहे.
मतदार यादीतून नावे गायब होणे, मतदानापासून वंचित राहणे आदि अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पूर्ण मतदान नोंदणी मोहीम राबवण्यात येत आहे. गेल्या मे महिन्यापासून सुरू असलेल्या मोहिमेस मतदारांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा क्षेत्रामध्ये सुमारे तीन टक्के मतदार वाढले. त्यामुळे मतदान नोंदणी कार्यक्रम केवळ एक ‘फार्स’ ठरत आहे.
मालेगावी दोन्ही मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ झाला असल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यावेळेस सुधारित याद्यांमध्ये नाव नसणे, नावे अन्य मतदान केंद्रांवर असणे असे आरोप खुद्द लोकप्रतिनिधी व मतदारांनी केले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगातर्फे जानेवारी २०१४ पासून विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
त्यानुसार जून महिन्यात तालुक्यातील मध्य व बाह्य मतदारसंघातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या याद्यांबाबत हरकत व नवीन नाव नोंदणीसाठी सांगण्यात आले. मतदार निरंतर नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली. त्यानुसार मतदार व लोकप्रतिनिधी, विविध पक्षांच्या प्रमुखांना सूचना करण्यात आल्या. मालेगाव तहसील कार्यालयात सध्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची लगीनघाई सुरू आहे.
मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्रात पूर्वी २,३५,५८६ इतके मतदार होते. त्यात केवळ ३.१५ टक्के इतकी वाढ झाली तर मालेगाव बाह्य विधानसभा क्षेत्रात पूर्वी २,८८,४१२ इतके मतदार होते. त्यात सुमारे ३.३१ टक्के इतकी वाढ झाली. मतदार यादीत नावे नोंदणीसाठी प्रशासनातर्फे काही शाळांमध्ये जनजागृती व पथनाट्य अभियानसुद्धा राबवण्यात येत असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी गिरीश वाखारे यांनी सांगितले तरीसुद्धा मोहिमेस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असे एकंदरीत आकडेवारीवरून दिसून येत आहे.