मद्यपी आढळल्यास ११ हजारांचा दंड
By Admin | Updated: June 25, 2014 00:10 IST2014-06-24T21:28:25+5:302014-06-25T00:10:49+5:30
मद्यपी आढळल्यास ११ हजारांचा दंड

मद्यपी आढळल्यास ११ हजारांचा दंड
राजेश पवार
भऊर
ग्रामीण भागात ‘गाव करील ते राव काय करील?’ अशी एक म्हण अस्तित्वात आहे. भऊर (ता. देवळा) या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामसभेच्या माध्यमातून संपूर्ण गाव परिसरात दारूबंदीचा निर्णय घेऊन आदर्श निर्माण केला आहे.
गावात कित्येक वर्षांपासून संपूर्ण परिसरात दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत होती. गावातील सामाजिक कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु त्यांना त्यात यश येत नव्हते. शेवटी ग्रामपंचायत व तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून हनुमान मंदिराच्या आवारात विशेष ग्रामसभेचे आयोजन करून गाव परिसरात संपूर्ण दारूबंदीचा ठराव करून निर्णय घेण्यात आला.
भऊर गावात मद्यपी आढळल्यास सुमारे ११ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येऊन मद्यनिर्मिती व विक्री करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. परिसरात दिवसेंदिवस मद्यपींची संख्या वाढून सर्वसाधारणांसह तरुण पिढीही मद्याकडे आकर्षित होऊन संपूर्ण कुटुंबासह तरुण पिढीचे शारीरिक, मानसिक आरोग्य धोक्यात येऊन त्यांचे नुकसान होत होते. गत चार ते पाच वर्षांपासून दारूनिर्मिती व विक्रीबाबत भरून परिसरातून नाराजी व्यक्त होऊन दारूबंदीची मागणी होत होती. परंतु त्यासाठी सर्वांकडून प्रयत्न केले जात नव्हते. सध्या दारूच्या व्यसनामुळे शेतकरी कुटुंबाचे आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यामुळे संपूर्ण गावाने एकत्र येऊन विशेष ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा निर्णय घेतला. गावातील ज्येष्ठ नागरिक कारभारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली.
ग्रामसभेस उपसरपंच कडू पवार, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील पवार, काशीनाथ पवार, रणजीत पवार, मोहन पवार, दादाजी पवार, काकाजी पवार, उमेश पवार, प्रकाश पवार, जयवंत पवार आदिंसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, सोसायटी सदस्य, ग्रामस्थांसह महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.