अरेरावी अचानक अशी अगतिक कशी झाली?
By Admin | Updated: July 8, 2014 01:00 IST2014-07-08T00:31:01+5:302014-07-08T01:00:51+5:30
अरेरावी अचानक अशी अगतिक कशी झाली?

अरेरावी अचानक अशी अगतिक कशी झाली?
संजय पाठक
नाशिक
राजकारणात राजी-नाराजीचा खेळ सुरू असतो हे खरे असले, तरी ठाकरी घराण्याचा बाजच मुळी वेगळा. नाराज असेल तर राजी करण्याच्या भानगडीत न पडता खुशाल जा असे सांगणाऱ्या ठाकरी शैलीला बाजूला दूर सारून ज्या पद्धतीने राज यांनी पक्षाचे एक शिलेदार आमदार वसंत गिते यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले, ते बघता राज यांची हतबलता आणि त्यामागेच आलेली अपरिहार्यता अधोरेखित झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले. साहजिकच शिवसेनेला मानणाऱ्या अनेकांना तर राज यांच्यातच शिवसेनाप्रमुखांचे प्रतिबिंब दिसत असते. त्यांचा हजरजबाबीपणा, लकब, मिश्कीलपणा असे अनेक गुण राज यांच्यात आहेत. शिवसेनाप्रमुख म्हणून काम करताना बाळासाहेब ठाकरे यांची संघटना हाताळण्याची एक वेगळीच शैली होती. संघटनेतून बाहेर पडण्याचे धाडस कोणी करत नव्हते आणि केले तर शिवसेनास्टाईल धडा शिकवला जाईल या भीतीने पक्षांतर करणारा काही दिवस तरी दडी मारून बसत असे. शिवसेनेची दहशत असतानाचे खोपडे प्रकरण असो अथवा छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यावर झालेले हल्ला प्रकरण असो, अन्य पक्षांपेक्षा ही वेगळीच धाटणी राहिली आहे. कालांतराने हा आक्रमकपणा कमी झाला असला, तरी शिवसेनाप्रमुखांनी पक्ष सोडणाऱ्यांना रोखले मात्र नाही. गेले तर खुशाल जा, असे बजावताना जेथे जाल तेथे तरी प्रामाणिक राहा असे ते आयाराम गयारामांना सांगत. अनेक माजी मंत्र्यांचाही त्यात समावेश होता. परंतु ठाकरे घराण्याचा हाच शिरस्ता अचानक मोडीत निघाला की काय, असा प्रश्न नाशिकमधील आमदार गिते प्रकरणातून निर्माण झाला आहे.
मनसे स्थापन झाल्यापासून राज ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार असलेले वसंत गिते हे नाशिक नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात सर्र्वेसर्वा आहेत. गिते यांनी दिलेला शब्द हाच मनसेत प्रमाण मानला जात होता. असे असताना, गेल्या काही महिन्यांपासून आणि विशेषत: लोकसभा निवडणुकीत गिते यांच्या नेतृत्वाकडे राज यांनी संशयाने पाहिले आणि नंतर घेतले गेलेले निर्णय गिते यांच्या पचनी पडले नाहीत. ज्या सभेत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वत: उतरण्याची घोषणा केली त्याच सभेत व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस आणि विधानसभेतील गटनेता असलेले वसंत गिते दिसले नाहीत आणि पाठोपाठ घडत गेलेल्या घटनांनी गिते नाराजच होत गेले. वस्तुत: गिते यांना ज्या बाबी खटकल्या होत्या, त्या गेल्याच आठवड्यात त्यांनी राज यांच्या कानीही घातल्या होत्या. त्याची दखल घेतली नसल्यानेच गिते यांनी वेगळा विचार सुरू केला. इतकेच नव्हे, तर भाजपा आणि शिवसेनेतील पक्षांतराविषयी चर्चा सुरू झाल्या आणि राज ठाकरे थेट नाशिक सुभ्यावर दाखल झाले.
परंतु त्यांच्या स्वागतलाही गिते नाहीत की दूरसंवादही नाही. तेव्हा वातावरण बरेच गढूळ झाले असल्याचा अंदाज राज यांना आला; परंतु अशा स्थितीत गिते यांची मनधरणी करण्यासाठी थेट राज हेच जाणार असल्याच्या चर्चा पसरल्या. राज यांनी असे काही केले नसले, तरी नाशिकचा त्यांचा दौरा ही गिते यांची नाराजी दूर काढण्यासाठीच होता, हे सोमवारी स्पष्ट झाले. पक्षाचे सरचिटणीस असलेले आमदार नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर आणि दीपक पायगुडे या त्रिमूर्तीने गिते यांच्या मनधरणीसाठी नाशिककडे धाव घेऊन दोन तास खर्ची घातले. खुद्द राज यांनी गिते यांची नाराजी दूर करण्यासाठी व्यक्तिगत चर्चा केली. त्यातून राज या विषयावर किती गंभीर आहेत, हेच दिसून आले. राजकारणात वारे बदलायला वेळ लागत नाही. त्यामुळे ज्या दिशेने वारे वाहतात, त्याच दिशेने गिते यांना जावे वाटले असेल तर सांगता येत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाचे पानिपत बघता आणि महायुतीची हवा दिसू लागताच गिते यांनी दिशाबदलाची तयारी केली असेल तर तीही राजकारणाचा एक भाग आहे. म्हणून राज ठाकरे यांनी इतकी अगतिकता दाखवावी, हे काहीसे अनकालनीय आहेच; शिवाय वदलत्या वाऱ्यामुळेच ठाकरे यांची कार्यशैली तर बदलली नाही ना?
अविनाश अभ्यंकरांचे किकिंग अप!
नाशिकमधील मनसेत बेबनाव, सत्तेचे केंद्रीकरण आणि पालिकेतील सुमार कामगिरी या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये शहराध्यक्षपदी समीर शेटे यांच्याऐवजी राहुल ढिकले यांना नियुक्त केले आणि शहर संपर्क अध्यक्षपदी मुंबईचे अविनाश अभ्यंकर यांना नियुक्त केले. अभ्यंकर यांनी त्यानंतर मनसे नगरसेवकांच्या प्रभागात दौरे केले, कामांच्या याद्या केल्या, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. परंतु हे सर्व करताना स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याचे निमित्त झाले आणि रोष वाढायला सुरुवात झाली. आमदार वसंत गिते यांच्या दृष्टीनेदेखील हे नाराजीचे कारण ठरले. त्या पार्श्वभूमीवर अभ्यंकर यांच्याकडे नाशिकबरोबरच मराठवाडासारख्या मोठ्या प्रादेशिक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणायला नाशिक शहरापेक्षा कैकपटीने मोठी जबाबदारी देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांना मराठवाड्यात पाठवून नाशिकमधील गितेंसारख्या काही पदाधिकाऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याचे दिसत आहे.