काँग्रेससह हिरेंच्या विजयी परंपरेला छेद
By Admin | Updated: September 4, 2014 00:06 IST2014-09-03T22:34:19+5:302014-09-04T00:06:32+5:30
काँग्रेससह हिरेंच्या विजयी परंपरेला छेद

काँग्रेससह हिरेंच्या विजयी परंपरेला छेद
दाभाडी विधानसभा मतदारसंघावर हिरे घराण्याची असलेली मक्तेदारी तब्बल २००४ मध्ये अपक्ष उमेदवारी केलेल्या; परंतु मुळात शिवसेनेचे असलेल्या दादा भुसे यांच्यामुळे संपुष्टात आली. दाभाडीचे राजकारण हिरे घराण्याभोवती फिरत असे. दाभाडीत भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, डॉ. बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे यांनी सत्ता उपभोगली मात्र २००४ मध्ये हिरे घराण्याविरोधात जनमत गेल्याने आणि सर्वच राजकीय पक्षांनी मालेगाव विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येत ‘हिरे हटाव’चा नारा दिल्याने दादा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा पराभव करीत दाभाडी गडावरील हिरे घराण्याची मक्तेदारी संपुष्टात आणली. नेहमी हिरे यांना कट्टर विरोध करणारे सुरेश निकम यांनीही भुसे यांना पाठिंबा देत निवडणूक रिंगणातून माघार घेत तटस्थ राहणे पसंत केल्याने भुसे विरोधात हिरे अशी कडवी झुंज झाली.
मालेगाव विधानसभा मतदारसंघातून केवळ एकदाच निहाल अहमद यांना मंत्रिपद मिळाले, मात्र जिल्ह्याच्या राजकारणात हिरे परिवाराने तब्बल ३५ वर्षे नेतृत्व केले. त्यामुळे राज्यात हिरेंचा वरचष्मा होता. नव्वदच्या दशकात दाभाडीमध्ये हिरेंचे वर्चस्व होते. तरी १९९०च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतांचा टक्का घसरला होता. त्यांच्याबद्दल तालुक्यातील मतदारांकडून विरोध होऊ लागला होता. त्यात शिवसेना व जनता दल, हिंदू एकतासारखे पक्ष काँग्रेसला आव्हान देण्यासाठी समोर ठाकले होते. यावेळेस पुष्पाताई हिरे यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर डॉ. बळीराम हिरे परिवार निवडणुकीच्या फडापासून दूर राहिले. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीशी नाळ जोडल्या गेलेल्या शिवसेनेचा झंझावात तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू होता. पुष्पाताई हिरेंसमोर शिवसेनेने मोठे आव्हान उभे केले होते. त्यावेळी सेनेचे ग्रामीण नेतृत्व करणारे अशोक दामोदर निकम हे पुष्पातार्इंसमोर तुल्यबळ उमेदवार होते तर जनता दलातर्फे नरेंद्र मेघ:श्याम अहिरे यांनी उमेदवारी केली होती. या तीन उमेदवारांसह इतर जातीधर्मांचे आठ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात नशीब आजमावत होते. या निवडणुकीत पुष्पाताई हिरे विजयी झाल्या होत्या. त्यांना ४३ हजार ४६० मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिवसेनेचे अशोक निकम यांना ३२ हजार ५७७ मते मिळाली होती. परंतु अगदी नवख्या सेनेच्या उमेदवाराने सत्ताधीशांना मोठी टक्कर दिल्याची चर्चा जिल्हाभरात झाली. त्यावेळेला तालुकाभरात शिवसेना पराभूत झाली तरी चांगले यश मिळाले होते. निहाल अहमद यांच्या जनता दलाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र अहिरे यांना एक हजार ८३० मतांवर समाधान मानावे लागले. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे मालेगाव शहरात जनता दलाचा बोलबाला असला तरी दाभाडीत मात्र जनता दल निष्प्रभ ठरले होते.
१९९५ची निवडणूक पुष्पाताई हिरे आणि डॉ. बळीराम हिरे यांच्यात झालेली निवडणूक गाजली. या निवडणुकीतही हिरे परिवाराचा बोलबाला दिसून आला. अखेरीस पुन्हा पुष्पाताई हिरे निवडून आल्या. या निवडणुकीत दाभाडी विधानसभा क्षेत्रात राजकीय स्थिती ढवळून निघाली होती. कारण पुष्पाताई हिरे यांना इंदिरा काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळाली, तर डॉ. बळीराम हिरे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. राज्यस्तरीय तिकीट वाटपाच्या घडामोडींमुळे दाभाडीमध्ये शिवसेनेऐवजी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार देण्याचा निर्णय झाला व यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे १९९५ची निवडणूक वरकरणी तिरंगी दिसत असली तरी आखाड्यात तब्बल १६ उमेदवार रिंगणात होते. यात इंदिरा कॉँग्रेस, भाजपा, जनता दल, बसपाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. मात्र खरी लढत पुष्पाताई हिरे, डॉ. बळीराम हिरे आणि सुरेश निकम यांच्यामध्ये लक्ष्यवेधी ठरली. जनता दल, बसपा यांचा पार धुव्वा उडाला होता. बसपातर्फे अॅड. एल.के. निकम, तर जनता दलातर्फे अॅड. दिलीपसिंग शिंदे यांनी उमेदवारी केली. या लढतीमध्ये पुष्पाताई हिरे ४० हजार १२६ मते मिळवून पुन्हा विजयी झाल्या. त्यांनी आपले कट्टर प्रतिस्पर्धी डॉ. बळीराम हिरे यांचा पराभव केला. डॉ. हिरे यांना ३७ हजार ७१६, तर सुरेश निकम यांना ३१ हजार ५०२ मते मिळाली. नवख्या भाजपा व पारंपरिक प्रतिस्पर्धी डॉ. हिरे यांच्यामुळे पुष्पाताई हिरे यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटल्याची चर्चा तालुक्यात रंगली होती. निवडणुकीत केवळ तालुक्याचा विकास, गरिबांसाठी विविध योजना, आरक्षण आदि विषयांवर प्रचार रंगला होता. मागील सर्व निवडणुकीचा अनुभव पाहता कायम विजयश्री मिळविणाऱ्या पुष्पाताई हिरे यांच्यामुळे दाभाडी मतदारसंघाची समीकरणे हिरे परिवाराभोवती फिरत होती. तेच ते प्रचाराचे मुद्दे व तीच ती प्रचार यंत्रणा असायची.
यानंतरच्या निवडणुकीत प्रशांत हिरे यांचे नेतृत्व उदयास येऊ लागले होते. १९९९च्या निवडणुकीत पुष्पाताई हिरे पुन्हा निवडणुकीत इच्छुक असताना कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे पुष्पाताई हिरे यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे साहजिकच तरुण आणि नवे नेतृत्व म्हणून प्रशांत हिरे यांच्याकडे पाहिले गेले. प्रशांत हिरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार होते. राकॉँचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी प्रशांत हिरे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यात पुष्पातार्इंनी मतदारांना भावनिक आवाहन करीत ‘माझ्या मुलाला संधी द्या’ म्हणून आर्जव केले होते. हिरे परिवारात या कारणामुळे काहीसा वाद झाला. या उमेदवारीच्या वादामुळे १९९९पासून पुष्पाताई हिरे यांना राजकीय संन्यास घ्यावा लागला. त्यामुळे दाभाडीत पुन्हा पारंपरिक प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. बळीराम हिरे हे भारतीय कॉँग्रेसतर्फे तर सुरेश निकम भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. जनता दल, बसपा या पक्षाने दाभाडीत उमेदवार दिले नाहीत. प्रमुख पक्षाचे तीन व अन्य दोन अपक्ष असे फक्त पाच उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूकसुद्धा हिरेंसाठी अस्तित्वाची ठरणार होती म्हणून या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. यावेळेस राष्ट्रवादी कॉँग्रेस, भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्यांच्या सभा, प्रचारामुळे मतदारसंघ ढवळून निघाला होता. निकालसुद्धा अपेक्षेप्रमाणे लागतील का याकडे सर्वांचे लक्ष होते.
या निवडणुकीच्या आखाड्यात पहिल्यांदाच उमेदवारी करणारे प्रशांत हिरे यांचा विजय अचंबित करणारा होता. यात प्रशांत हिरे ४१ हजार ३०४ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार सुरेश निकम आणि डॉ. बळीराम हिरे यांचा पराभव केला होता. सुरेश निकम यांंना ३५ हजार २७५, तर डॉ. हिरे यांना ३० हजार ६९७ मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. प्रशांत हिरे यांनी सहा हजार २९ मतांनी भाजपाचे सुरेश निकम यांचा पराभव केला. पहिल्यांदा निवडणूक लढवूनही प्रशांत हिरे यांनी दाभाडीचा गड आपल्या ताब्यात राखला होता. किंबहुना याचे बक्षीस म्हणूनच शरद पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेत परिवहन व राजशिष्टाचार राज्यमंत्रिपद दिले. त्यामुळे हिरे यांच्या कार्यकाळातच मालेगावात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मिळाले.