व्यापकतेने व्हावे इतिहासाचे लेखन

By Admin | Updated: March 29, 2015 00:53 IST2015-03-29T00:53:12+5:302015-03-29T00:53:50+5:30

आनंद हर्डीकर : सार्वजनिक वाचनालयाचे विविध वाङ्मयीन पुरस्कार प्रदान

The history writing should be widely practiced | व्यापकतेने व्हावे इतिहासाचे लेखन

व्यापकतेने व्हावे इतिहासाचे लेखन

 नाशिक : राष्ट्रीय इतिहासाचे आतापर्यंत विकृत चित्रण करण्यात आले असून, स्वातंत्र्यलढ्याच्या यशाचे श्रेय महात्मा गांधींसारख्या ठराविक व्यक्तींनाच देण्यात आले आहे. लेखक हे लोकशाही परंपरेचे पाईक असतात. त्यांनी व्यापक व सर्वसमावेशक इतिहासाचे लेखन करून नवे साहित्य निर्माण करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखक, संपादक आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक वाचनालयाच्या १७५ व्या वार्षिकोत्सवानिमित्त हर्डीकर यांच्या हस्ते विविध वाङ्मयीन पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात सुकन्या आगाशे (मुंबई) यांना वि. म. गोगटे पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या वतीने अभिषेक जाखडे यांनी पुरस्कार स्वीकारला. डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांना, ग. वि. अकोलकर पुरस्कार डॉ. दाऊद दळवी (ठाणे), मु. ब. यंदे पुरस्कार राजीव साने (पुणे), पु. ना. पंडित पुरस्कार संजीव लाटकर (मुंबई), कै. धनंजय कुलकर्णी पुरस्कार डॉ. आशुतोष जावडेकर (पुणे), अशोक टिळक पुरस्कार अभिराम भडकमकर यांना प्रदान करण्यात आला. विनोदी साहित्यासाठी एकही पुस्तक पात्र न ठरल्याने यंदा विमादी पटवर्धन पुरस्कार देण्यात आला नाही.
यावेळी हर्डीकर म्हणाले की, या पुरस्कारांसाठीची निवड प्रक्रिया व कार्यक्रम पद्धती शासनाने स्वीकारण्याची गरज आहे. शासकीय कार्यक्रमांत एकापाठोपाठ पुरस्कार दिले जातात. त्यामुळे पुरस्कारप्राप्त लेखकाने नेमके काय लिहिले, त्याच्या लिखाणातील सौंदर्यस्थळे कोणती, हेच कळत नाही, अशी टीका करीत त्यांनी याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. दाऊद दळवी यांनी सांगितले की, मराठीत तांत्रिक विषयावर ललित अंगाने पुस्तके लिहिली जात नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे लेखन सुरू केले. साहित्यात मुस्लिम स्थापत्यकला हा प्रवाह दुर्लक्षित राहिल्याचेही ते म्हणाले. प्रा. डॉ. वृंदा भार्गवे म्हणाल्या, कथा-कादंबरीलेखनाकडे उपेक्षेने पाहिले जाते. मात्र ते क्षुद्र नाही. लिहिणे व जगण्यातील अंतर कमी करणे महत्त्वाचे आहे. सध्याचा विचारांच्या गर्तेत हरवलेला मध्यमवर्गीय तरुण व त्याची कुटुंबव्यवस्था हा केंद्रबिंदू मानून आपण लेखन केल्याचे त्या म्हणाल्या.
डॉ. राजीव साने म्हणाले, आपला लेखनाचा पिंड सैद्धांतिक आहे. सतत बदलत्या वास्तवाचा अर्थ लावताना नवे सिद्धांत उभारले नाहीत, तर गोंधळ वाढतो. सध्याचे प्रश्न नव्या सिद्धांतात बसवणे ही कसरत असून, ती आपण करीत आहोत. कथा-कादंबरी ही गोष्ट नसून तेदेखील वैचारिक साहित्यच असल्याचे संजीव लाटकर यांनी सांगितले. विचारप्रवृत्त करणारा कोणताही प्रकार कथा म्हणून गणला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. कवितेच्या तुलनेत कादंबरीचा लेखनकाल अधिक असल्याने हे लेखन अवघड असते. कादंबरी ही सामाजिक संवादाविषयी बोलत असल्याने महत्त्वाची असते, असे आशुतोष जावडेकर यांनी सांगितले.
सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष वासुदेव दशपुत्रे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष नरेश महाजन यांनी परिचय करून दिला. सुरेश गायधनी, स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: The history writing should be widely practiced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.