भर उन्हात परीक्षेची ‘शिक्षा’
By Admin | Updated: June 30, 2014 00:57 IST2014-06-30T00:44:19+5:302014-06-30T00:57:25+5:30
भर उन्हात परीक्षेची ‘शिक्षा’

भर उन्हात परीक्षेची ‘शिक्षा’
नाशिक : पोलीस भरतीप्रक्रियेत शारीरिक चाचणीत मुंबई आणि पुणे येथे सुमारे सात उमेदवारांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच आणि या भरतीप्रकरणी गृह खात्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले असतानाही पोलीस प्रशासनाने त्यापासून काहीच बोध घेतला नसल्याचे उदाहरण नाशिकमध्ये प्रत्ययास आले असून, रविवारी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने पोलीस भरतीची लेखी परीक्षा भर उन्हात घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. लेखी परीक्षेसाठी पहाटेपासूनच कवायत मैदानावर दाखल झालेल्या ३,६५० उमेदवारांना भर दुपारी टळटळीत उन्हात आणि धुळीचा त्रास सहन करत परीक्षेची शिक्षा भोगावी लागली.
शहर पोलीस आयुक्तालयाकडून २२ जून रोजी मैदानी चाचणीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती आणि त्याचवेळी लेखी परीक्षेची तारीखही घोषित करण्यात आली होती. त्यानुसार ४७१ जागांसाठी ४,२८१ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. या सर्व उमेदवारांना रविवारी (दि. २९ जून) सकाळी ६ वाजता कवायत मैदानावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज पहाटेपासूनच लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची गर्दी कवायत मैदानावर झाली. परीक्षेपूर्वी उमेदवारांना चेस्ट नंबर दिले जाणार होते.
उमेदवारांना मैदानाबाहेरील आवारात बसविण्यात आले. तोपर्यंत परीक्षेचे नियोजन करणारे आणि बंदोबस्ताला असणारे कर्मचारी कवायत मैदानावर हळूहळू दाखल होत होते. या कर्मचाऱ्यांची हजेरी आटोपल्यानंतर उमेदवारांना चेस्ट नंबरसाठी पाचारण केले जाऊ लागले. मात्र, चेस्ट नंबर देऊन मैदानात प्रवेश देणे सोयीस्कर असताना पोलीस प्रशासनाकडून उमेदवाराचे हॉल तिकीट, ओळखपत्र आणि नंतर चेस्ट नंबर अशी वेळखाऊ प्रक्रिया राबविली गेली. परिणामी, एका उमेदवारासाठी सुमारे पंधरा मिनिटांचा वेळ खर्ची पडला. परीक्षेसाठी प्रत्यक्षात ३,६५० उमेदवार हजर झाले होते.
या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा सकाळच्या वेळी होणे अपेक्षित असताना पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेसाठी पेपर प्रत्यक्षात हातात दुपारी एक वाजेच्या सुमारास देण्यात आला. तोपर्यंत उमेदवारांना खाण्यासाठीही काहीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.
परिणामी, अनेक उमेदवारांनी कवायत मैदानाबाहेरील दुकानांमध्ये येऊन फास्टफूड, खाद्यपदार्थांचा आधार घेतला. भर दुपारी तळपत्या उन्हात दीड तासाची लेखी परीक्षा उमेदवारांसाठी अग्निदिव्यच ठरले. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उमेदवारांना डोक्याला मुंडासे, रुमाल बांधावे लागले. पोटात अन्नाचा कण नाही आणि माथ्यावर तप्त ऊन या चक्रात अडकलेल्या उमेदवारांचे अक्षरश: हाल झाले. (प्रतिनिधी)