जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र
By Admin | Updated: May 17, 2016 23:57 IST2016-05-17T23:57:37+5:302016-05-17T23:57:37+5:30
जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र

जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र
येवला/निफाड : गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या उष्णतेच्या लाटेने संपूर्ण जिल्हा होरपळत आहे. मंगळवारी जिल्ह्यात सर्वाधिक तपमान येवला येथे ४३, तर त्या खालोखाल निफाड येथे ४१.६ अंश सेल्सिअस तपमान नोंदविले गेले. पुढील ४८ तास राज्यात अशीच स्थिती राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. एप्रिलमध्ये चढे तपमान असल्यामुळे महाराष्ट्र होरपळला होता. मात्र मे सुरू होताच राज्यात वळवाच्या पावसास सुरुवात झाली. त्यामुळे राज्याचे तपमान वेगाने खाली येऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा वेगाने पारा वर चढल्याने जिवाची काहिली होऊ लागली आहे.येवला : शहरात उन्हाची तीव्रता जसजशी वाढत आहे, तसतशी दुष्काळाची दाहकताही वाढत असून, भरदुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसत असून, प्रत्येकजण सावलीचा शोध घेताना दिसत आहे. पाण्याची तीव्र टंचाई तर दुसरीकडे उन्हाने मात्र नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाचा पारा आता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याने सकाळी १० वाजेपासूनच घराबाहेर पडणे मुस्कील होत आहे. परिणामी शहरातील सर्वच रस्त्यांवर दुपारी ४ वाजेपर्यंत अघोषित संचारबंदी अशी स्थिती दिसत आहे. विशेष म्हणजे वाढत्या उन्हाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. येवल्यात मंगळवारी पारा ४३ अंशावर पोहचला. हे तपमान या उन्हाळ्यातील सर्वाधिक असल्याची नोंद आहे.
तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून अल्पपर्जन्यमान आहे. परिणामी दुष्काळासह तीव्र पाणीटंचाईच्या झळा येथील नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. आता उन्हाचा पाराही कमाल ४३ अंशावर गेल्याने घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. सकाळी ९ वाजताचा उन्हाचा चटकाही आता सहन होत नाही. दुपारच्या उन्हाचा चटका आणि झळा अतिशय तीव्र असून, सहन करण्यापलीकडच्या आहेत. गेल्या उन्हाळ्यात येवल्याचा पारा ४४पर्यंत गेला होता. आगामी दोन दिवसात यंदा पारा ४४च्या पुढे जातो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. येवला शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या भागात एरवी वर्दळ असते मात्र उन्हाचा तडाखा अतिशय तीव्र झाल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे चित्र आहे. (लोकमत चमू)