साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By Admin | Updated: September 4, 2014 00:04 IST2014-09-03T22:09:08+5:302014-09-04T00:04:44+5:30

साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

The health of the people due to the stagnant water | साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 

नांदूरशिंगोटे : पावसाच्या अधूनमधून कोसळणाऱ्या रिमझिम सरी व पाणी प्रवाहित न केल्याने येथील नाशिक - पुणे महामार्गालगत साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. हे ठिकाण डास व विविध उपद्रवी कीटकांचे उत्पत्तीस्थान बनले आहे.
नाशिक - पुणे हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० हा नांदूरशिंगोटे गावाच्या मध्यातून जातो. या मार्गालगत सुमारे दहा वर्षांपूर्वी रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूने गटारी बांधण्यात आल्या होत्या. कालांतराने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष व काही व्यावसायिकांनी गटारी बुजवल्याने रस्त्यावरून वाहून जाणारे पाणी प्रवाहित होत नाही. ते रस्त्याच्या कडेला एकाच ठिकाणी मोकळ्या जागेत साचून रहाते. साचलेल्या पाण्यात वाऱ्यामुळे उडून पडलेले कागद, प्लॅस्टिक पिशव्या, विविध खाद्यपदार्थांचे तुकडे, फळे व भाजीपाल्याचा कचरा यामुळे या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. पावसाचे पाणी अनेक दिवसांपासून साचून राहिल्याने त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. हे ठिकाण म्हणजे डास, माशा, चिलटांचे उत्पत्ती केंद्र बनल्याने ग्रामस्थांना डासांपासून होणाऱ्या हिवताप, डेंग्यू आदि रोगांचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून हे पाणी प्रवाहित करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. तथापि, त्यांनी हात वर करीत हे काम बीओटी तत्त्वावर दुसऱ्या कंपनीकडे देण्यात आल्याने महामार्ग विभागाकडून कोणतीही उपाययोजना होणार नसल्याची माहिती दिली. सध्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गाची देखभाल व दुरुस्ती पुढील वीस वर्षांसाठी खासगी कंपनीकडे बीओटी तत्त्वावर देण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी व अन्य तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.
नाशिक - पुणे महामार्गालगतच पाणी साचले असून, एका बाजूने प्रचंड वाहने असल्याने दुसऱ्या बाजूने साचलेल्या पाण्यामुळे पायी चालणेही अवघड झाले आहे. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. ग्रामस्थांना गावात जाता येत नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. तसेच येथे आरोग्य उपकेंद्र असूनही ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने अद्यापपर्यंत कोणत्याही विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. (वार्ताहर)

Web Title: The health of the people due to the stagnant water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.