नगरसेवकाच्या बांधकामावर हातोडा

By Admin | Updated: July 3, 2016 00:46 IST2016-07-03T00:41:18+5:302016-07-03T00:46:22+5:30

मनपाकडून कारवाई : गोठ्याच्या बांधकामावर कारवाई

Hammer on the construction of the corporation | नगरसेवकाच्या बांधकामावर हातोडा

नगरसेवकाच्या बांधकामावर हातोडा

 नाशिक : राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक विनायक तथा नय्या खैरे यांनी म्हसरूळ परिसरात अनधिकृतपणे उभारलेल्या जनावरांच्या गोठ्यातील गव्हाणीचे पक्के बांधकाम ‘जैसे थे’ ठेवल्याने अखेर महापालिकेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत बांधकाम उद््ध्वस्त करण्याची कारवाई केली.
म्हसरूळ परिसरात किशोर सूर्यवंशी मार्गाजवळ असलेल्या १८ मीटर डीपी रस्त्यात गोठ्याचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते. नगरसेवक विनायक खैरे यांनी उभारलेल्या या गोठ्याबाबत परिसरातील नागरिकांच्या तक्रारी होत्या. थेट रस्त्यातच हा गोठा थाटण्यात आला होता. या गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र थेट रस्त्यावर येऊन त्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता, परंतु उघडपणे कुणी विरोध करत नव्हते. सदरचा गोठा हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले; परंतु राजकीय दबावामुळे गोठा हटविण्यास अडचणी उद्भवत होत्या. महापालिका आयुक्तांनी याबाबत कारवाईचे आदेश दिल्यानंतर अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी ३० मे रोजी पोलिसांचा फौजफाटा नेत गोठ्याचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही सुरू केली होती. परंतु, खैरे यांनी स्वत:हून अतिक्रमित बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केल्याने पथक माघारी परतले होते. नंतर खैरे यांनी सदर बांधकाम काढून घेण्यासाठी महिनाभराची मुदतही मागितली होती. त्यानुसार मुदत देण्यात आली, परंतु खैरे यांनी मुदतीतही बांधकाम हटविले नाही. केवळ पत्र्याचे शेड काढून घेताना आरसीसी बांधकाम केलेल्या सीमेंटच्या पक्क्या गव्हाणी तशाच ठेवल्या. त्यामुळे पुन्हा एकदा कब्जा होण्याची शक्यता होती.
शनिवारी महापालिकेने एक पोकलॅन आणि दोन जेसीबीच्या सहाय्याने सदर गव्हाणीचे पक्के बांधकाम उद््ध्वस्त केले. सीमेंटमधील सर्व गव्हाणी यावेळी हटविण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Hammer on the construction of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.