नाशिकमधील बिहारी बांधवांचा आनंदोत्सव
By Admin | Updated: November 9, 2015 00:41 IST2015-11-09T00:40:56+5:302015-11-09T00:41:23+5:30
सकाळपासून उत्सुकता : पाच वर्षांत विकासाची अपेक्षा

नाशिकमधील बिहारी बांधवांचा आनंदोत्सव
सातपूर : बिहार विधानसभा निवडणुकीत तेथील जनतेने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हाती पुन्हा राज्याची सूत्रे दिल्याने नाशिकमधील बिहारी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाच वर्षांत बिहारचा विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सकाळपासून या निकालाविषयी प्रचंड उत्सुकता होती. पूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर आनंदाचे वातावरण पसरले.
बिहारच्या निवडणुकीत बिहारी
जनतेने पुन्हा नितीशकुमार यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांनी केलेल्या कामांमुळे पुन्हा लोकांनी विश्वास टाकला आहे.
- अमरेंदर सिंग, श्रमिकनगर
बिहारच्या निवडणुकीत जात-पात आणि वर्णभेद असा खालच्या पातळीवर सर्वत्र राजकीय पक्षांनी प्रचार केला गेला. जाती-पातीच्या राजकारणामुळेच पुन्हा लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांनी सत्ता प्राप्त केली.
- दिनेश शुक्ल, शिवाजीनगर
नितीशकुमार, लालूप्रसाद आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र येऊन महाआघाडी तयार केली. भाजपाच्या विरोधातील महाआघाडीने बहुमत प्राप्त केले. विशेष म्हणजे नितीनकुमार यांच्यामुळेच हे बहुमत प्राप्त झाले आहे.
- अमितकुमार महातो, माळी कॉलनी
बिहारचा अद्याप विकास झालेला नाही. तेथील जनता पूर्णपणे साक्षर नाही. अज्ञानी आहे. अज्ञानी ठेवण्याचा प्रयत्न नेत्यांनीच केला आहे. भाजपा सत्तेत आली असती, तर भाजपाने बिहारचा विकास केला असता.
- उदय सिंग, श्रमिकनगर
लालूप्रसाद, नितीशकुमार यांच्या हाती सत्ता दिली. त्यात लालूप्रसाद यांनी काहीही विकास केला नाही. नितीशकुमार यांनी थोड्या-फार प्रमाणात सुधारणा केल्या.
- अजयकुमार महातो, माळी कॉलनी
आजही बिहारमधील शाळा आणि दवाखान्यांमध्ये मोकाट जनावरांचा सर्रास वावर असतो. अशी स्थिती पहावयास मिळते. नितीशकुमार यांनीच सुधारणा केल्या. आता विकास साधावा.
- हरिनंदन मिश्रा, आयटीआय कॉलनी
बिहारचा विकास झाला नसल्याने तेथील बेरोजगार युवकांना रोजगार शोधण्यासाठी अन्य राज्यात जावे लागते. आता नितीशकुमार यांनी औद्योगिक क्षेत्राचा विकास करावा, उद्योग उभारावेत आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
- दिलीपसिंग, श्रमिकनगर
बिहारचा निकाल अपेक्षित लागला. भाजपाने चुकीच्या पद्धतीने प्रचार केला. त्याचा फटका त्यांनाच बसला. नितीशकुमार यांच्यामुळेच महाआघाडीला पुन्हा सत्ता मिळाली आहे.
- श्रीकांत सिंग, माळी कॉलनी
वाढती महागाई, पंतप्रधान मोदी यांच्यावरील विश्वास हळूहळू कमी होऊ लागला आहे. नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांच्या विरोधात चुकीचा प्रचार केल्याने भाजपाला पराभव पत्करावा लागला.
- राम उदयसिंग, श्रमिकनगर
बिहारचा कोणीही विकास केला नाही. नितीशकुमार यांनी काही प्रमाणात सुधारणा केल्या म्हणूनच पुन्हा नितीशकुमार यांना संधी मिळाली आहे. आता विकास करावा ही अपेक्षा.
- हिराप्रसाद महातो, श्रमिकनगर