ग्रामस्थांनीच पकडले धान्याचे वाहन
By Admin | Updated: August 16, 2016 23:15 IST2016-08-16T23:14:52+5:302016-08-16T23:15:14+5:30
महिनाभरापासून अन्नधान्याविना : गावकरी हवालदिल

ग्रामस्थांनीच पकडले धान्याचे वाहन
नाशिक : रेशनच्या धान्याचा काळाबाजार करण्यासाठी गुजरातला जाणाऱ्या धान्याचे वाहन गावातील जागरूक नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने तेव्हापासून बंद झालेल्या रेशन दुकानातून धान्य मिळणे मुश्कील झालेल्या ग्रामस्थांनी पर्यायी व्यवस्थेसाठी थेट जिल्हा पुरवठा कार्यालय गाठले. विशेष म्हणजे राज्यभर धान्य घोटाळ्याने गाजलेल्या सुरगाणा तालुक्यातच ही घटना घडली आहे.
सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हेपासून काही अंतरावर असलेल्या अंबुपाडा येथे ही घटना घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गावातील रेशनवर नियमित धान्य मिळत नसल्याची तक्रार आदिवासी नागरिक करीत असताना शाासनाकडूनच धान्य मिळत नसल्याची सबब रेशन दुकानदार पुढे करीत होता. यासंदर्भात तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने रेशन दुकानासाठी येणाऱ्या धान्यावर पाळत ठेवून असलेल्या ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वीच रात्री गुजरात राज्यात नोंदणी झालेल्या वा हनात रेशनचे धान्य ठेवले जात असल्याचे पाहून वाहन अडविले. परंतु दुकान बंद झाल्यानंतर अंबुपाडा व परिसरातील दोनशेहून अधिक आदिवासींना मात्र रेशनच्या धान्यापासून वंचित आहेत. मंगळवारी मोहन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली अंबुपाडा येथील आदिवासींनी थेट जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेत आपली अडचण मांडली. दुकान बंद झाल्यामुळे रेशनचे धान्य मिळत नाही. आदिवासींवर खुल्या बाजारातून चढ्या भावाने धान्य खरेदी करावे लागत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.