पूर्व भागातील द्राक्ष उत्पादक ढगाळ वातावरणाने धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:17+5:302021-01-08T04:43:17+5:30
एकलहरे : वारंवार होणारा वातावरणातील बदल, कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ हवामान व अचानक होणारा पावसाचा शिडकावा यामुळे ...

पूर्व भागातील द्राक्ष उत्पादक ढगाळ वातावरणाने धास्तावले
एकलहरे : वारंवार होणारा वातावरणातील बदल, कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ हवामान व अचानक होणारा पावसाचा शिडकावा यामुळे नाशिक तालुका पूर्व भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
द्राक्ष लागवडीपासून तर थेट बाजारात विक्रीसाठी नेण्यापर्यंत शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गेले आठ ते दहा महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील हंगाम कवडीमोल ठरला. दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पाच ते दहा रुपये किलोने द्राक्षे विकली. काहींनी खर्च परवडत नसल्याने बांधावरच खुडून टाकली. अशाही परिस्थितीत यंदाचा हंगाम जोरदार घेण्यासाठी शेतकरी पुन्हा कामाला लागले. तालुक्याच्या पूर्व भागातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, जाखोरी, चांदगिरी, मोहगाव, बाभळेश्वर, कालवी, गंगापाडळी, एकलहरेगाव, ओढा, शिलापूर, लाखलगाव या पंचक्रोशीत द्राक्षांच्या बागा जोमात फुललेल्या दिसतात. द्राक्षांचे घडही जोमदार आहेत, मात्र सध्याच्या बदललेल्या हवामानाचा द्राक्षघडांवर विपरीत परिणाम होतो की काय, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रभाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागत आहे.
चौकट===
शेतकऱ्यांचा खर्च वाढला
थंडी व धुक्यापासून निर्यातक्षम द्राक्षांचे रक्षण करण्यासाठी द्राक्षघडांना पेपर आच्छादन करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने ५० किलोच्या खताच्या गोणीसाठी बाराशे ते पंधराशे रुपये मोजावे लागतात. कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या किमतीही वाढल्या आहेत. डिपिंगसाठी लागणारे औषध साडेतीन ते चार हजार रुपये लिटरप्रमाणे खरेदी करावे लागते. वेलींवरील द्राक्षघडांच्या वेस्टणासाठी इंग्रजी पेपरची रद्दी ४० ते ५० रुपये किलोने घ्यावी लागते. त्यात पुढे काय दर मिळेल याची शास्वती नसतानाही सध्या मात्र वारेमाप खर्च करावा लागत असल्याचे शेतकरी सांगतात. (फोटो ०६ ग्रेप)