वाड्या-वस्त्यांसाठी ग्रामपंचायतीकडून टॅँकर
By Admin | Updated: June 12, 2016 23:42 IST2016-06-12T23:02:29+5:302016-06-12T23:42:57+5:30
नांदूरशिंगोटे : नळपाणीपुरवठा योजना नसल्याने पाणीटंचाई; पंचायत समितीचे टॅँकर अनियमित

वाड्या-वस्त्यांसाठी ग्रामपंचायतीकडून टॅँकर
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेत नांदूरशिंगोटे गावाचा समावेश आहे. त्यामुळे गावात व काही वस्त्यांवर दिवसाआड नळपाणीपुरवठा होत आहे. परंतु काही ठिकाणी पाणी योजनेचे पाणी न गेल्याने दरवर्षी तेथे उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाई जाणवते. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी स्थिती असल्याने वाड्या-वस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाझर तलाव, केटीवेअर बंधारे, सार्वजनिक विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. एकीकडे दुष्काळी स्थिती असताना तालुकास्तरावर टॅँकरसाठी प्रस्ताव पाठवले जातात. परंतु पंधरा दिवस उलटूनही पंचायत समितीकडून टॅँकर सुरू होत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुष्काळाची तीव्रता गंभीर असतानाही प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात पाण्यासाठी उपाययोजना होत नाही.
गत सप्ताहात नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीने स्वखर्चातून घंटागाडी, पाण्याचा टॅँकर व बसण्यासाठी बाक घेऊन लोकोपयोगी वस्तूंचे लोकार्पण केले होते. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी टंचाई भागात ग्रामपंचायत खर्चातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसांपासून पाण्याचे टॅँकर सुरू झाले आहेत. येथील चकोर वस्ती, माकडे वस्ती, कोलधाडवाडी, खारे वस्ती, गर्जे वस्ती, वाळके वस्ती, दौंड वस्ती, शेळके वस्ती, कांगणे वस्ती तसेच चास रोड, मानोरी रोड, बर्के रोड आदि भागातील काही ठिकाणी मागणीनुसार ७ ते ८ खेपा पुरवल्या जात आहेत. तसेच शासनाच्या धोरणानुसार ग्रामपंचायतीने पर्यावरण सप्ताहानिमित्त सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड केली आहे.
त्या सर्व ठिकाणीही ग्रामपंचायतीकडून झाडांना पाणी देऊन संवर्धन केले जात आहे. येथील मुख्य जलकुंभाजवळ दररोज टॅँकर भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. (वार्ताहर)