घाटमाथ्यावरच पावसाची कृपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 00:23 IST2016-06-30T23:21:57+5:302016-07-01T00:23:05+5:30
इगतपुरी : पावसाच्या प्रतीक्षेत भाताची लावणी खोळंबली

घाटमाथ्यावरच पावसाची कृपा
घोटी : एका दिवसाला दीडशे ते दोनशे मिलिमीटर आणि सरासरी तीन हजार पाचशे मिलिमीटर पाऊस होणाऱ्या इगतपुरी तालुक्यात केवळ इगतपुरी शहर आणि घाटमाथा परिसरातच पाऊस होत असल्याने इतर भागात मात्र अद्यापही भाताच्या पेरण्या पावसाच्या प्रतीक्षेत रखडल्याचे दिसत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेने यावर्षी दहा टक्केही पाऊस झाला नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. दरम्यान, इगतपुरी शहरात असलेल्या पर्जन्यमापक यंत्राची पावसाची आकडेवारी शासन अधिकृत ठरवत असल्याने याचा फटका तालुक्यातील इतर भागांना बसणार असून, शासनाने संपूर्ण तालुक्याची पावसाची सरासरी घेऊन ही आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
प्रचंड पावसाचा तालुका अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याला आरंभीच्या पावसाने दगा दिला आहे. मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्र लागले. हे नक्षत्रही तालुक्यात कोरडे जाण्याच्या मार्गावर
आहे. इगतपुरी तालुक्यात केवळ इगतपुरी शहर परिसर
आणि घाटमाथ्यावरच समाधानकारक पाऊस होत असल्याने केवळ
शहराची पावसाची आकडेवारी फुगली आहे.
हीच आकडेवारी संपूर्ण तालुक्याची दर्शवित इगतपुरी तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यात
सर्वाधिक पाऊस झाला असल्याचे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे; मात्र वस्तुस्थिती याउलट
असून, केवळ शहर आणि परिसरात पाऊस होत असून, इतर भागात
मात्र पावसाचे दर्शनही झाले
नसल्याने खरिपाच्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या असल्याचे
चित्र तालुक्यातील इतर भागात पाहण्यास मिळत आहे. विहीर,
नदीच्या पाण्यावर भाताची लागवड करण्याचा शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे
विहीर व नदीतील पाणी उचलण्याची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी भाताची लागवड विहीर आणि नदीच्या पाण्यावर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; मात्र विजेच्या सावळ्या गोंधळामुळे व अनियमित वीजपुरवठ्यामुळे या लागवडीही रखडल्या आहेत.