शासनाचे अनुदान तुटपुंजे
By Admin | Updated: August 30, 2016 00:52 IST2016-08-29T22:29:52+5:302016-08-30T00:52:45+5:30
जयदत्त होळकर : कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे

शासनाचे अनुदान तुटपुंजे
लासलगाव : शासनाने देऊ केलेली अनुदान रक्कम तुटपुंजी असून, त्यात उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने ऐन अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपये प्रति क्विंटलने अनुदान द्यावे, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली आहे.
सध्या बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांदा विक्र ीस येत असून, सदरचा कांदा शेतकऱ्यांनी माहे एप्रिल-मेमध्ये काढून तो चाळींमध्ये साठविलेला आहे. मात्र पावसाळी वातावरणामुळे सदरच्या कांद्याची प्रत खराब झाल्याने त्यास बाजार समित्यांमध्ये उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून, यापुढे कांदा उत्पादन घ्यावे किंवा नाही? या संभ्रमावस्थेत आहे. अशीच परिस्थिती २००८मध्ये उद्भवल्यानंतर तत्कालीन शासनाने त्यावेळी लाल कांद्यास शंभर रुपये क्विंटलने अनुदान दिले होते. दिवसेंदिवस बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी व वाहतूक खर्चात वाढ झालेली आहे. त्यामुळे त्यावेळच्या उत्पादन खर्चात व आजच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. यंदा उन्हाळ कांद्यासाठी एनएचआरडीएफने रु. ८१८ रुपये प्रतिक्विंटल उत्पादन खर्च असून, बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची विक्री सरासरी ५५० ते ६०० रुपये दराने होत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही. (वार्ताहर)