कुंभनियोजनाबाबत शासन-प्रशासन सुस्त

By Admin | Updated: July 19, 2014 01:08 IST2014-07-18T23:31:17+5:302014-07-19T01:08:57+5:30

कुंभनियोजनाबाबत शासन-प्रशासन सुस्त

Government administration slack | कुंभनियोजनाबाबत शासन-प्रशासन सुस्त

कुंभनियोजनाबाबत शासन-प्रशासन सुस्त

 नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे, पण कुंभनियोजनाबाबत शासन आणि प्रशासन सुस्त आहे. साधू-महंतांना विश्वासात न घेता त्यांची अवहेलनाच केली जात असल्याचा आरोप तपोवनातील श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाविषयी बोलताना महंत रामसनेहीदास यांनी सांगितले, प्रशासनाने अद्याप साधुग्रामसाठी लागणाऱ्या जमिनीबाबतचा निर्णय घेतलेला नाही. प्रशासनाकडे आम्ही सन २००३ मधील कुंभासाठी संपादित केलेल्या जमिनीची माहिती मागविली, तर ती उपलब्ध करून दिली जात नाही. केवळ राजकारण चालले आहे. तपोवनात मागील कुंभासाठी जी जागा संपादित केली त्याठिकाणी महापालिकेने रामसृष्टी प्रकल्पाचे निर्माण केले आहे. आता सिंहस्थ अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना जागेबाबतचे कसलेही नियोजन केलेले आढळून येत नाही. आजवर जे-जे सिंहस्थ झाले त्यावेळी तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराचे सहकार्य प्रशासनाला देण्यात आले आहे. परंतु प्रशासन कोणताही निर्णय घेताना साधू-महंतांना विश्वासातच घेत नाही. अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीला आमंत्रित केले नाही की कसलीही विचारपूस केलेली नाही. प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाकडून निधी येण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले जाते, परंतु येणारा निधी कोठे वापरला जातो आहे, याची माहिती दिली जात नाही. साधू-महंतांसाठी असणारा निधी त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांवरच खर्च झाला पाहिजे, अशी भूमिकाही रामसनेहीदास यांनी स्पष्ट केली.
लक्ष्मीनारायण मंदिराने दर सिंहस्थात येणाऱ्या साधू-महंतांची व्यवस्था केली आहे. त्यांचे आगतस्वागत केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातही लक्ष्मीनारायण मंदिराकडून साधू-महंतांना सुविधा पुरविल्या जातील. आम्ही यथाशक्ती आमची भूमिका पार पाडणारच आहोत; परंतु मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्याही दृष्टीने प्रशासनाने सुविधा पुरविण्याकामी तत्परता दाखविली पाहिजे. योग्य वेळी नियोजन केले नाही, तर संकट ओढू शकते, असा इशाराही रामसनेहीदास यांनी दिला.
शाहीमार्ग बदलण्याबाबत चालू असलेल्या हालचालींबाबतही रामसनेहीदास यांनी ठामपणे पारंपरिक मार्गानेच शाही मिरवणूक जाणार असल्याचे स्पष्ट केले. शाहीमार्ग हा परंपरेने चालत आलेला मार्ग आहे. या मार्गावर देवस्थाने आहेत. त्यांचे दर्शन करत साधू-महंतांची मिरवणूक पुढे-पुढे सरकत असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पर्यायी शाहीमार्गाचा विचार केला जाणार नाही. सन २००३ च्या कुंभात सरदार चौकात जी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे. गोदावरी प्रदूषणाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. गोदावरी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, हे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत. गोदावरी ही गंगा नदीनंतर भारतातील सर्वात मोठी नदी आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरी येतील. अशावेळी त्यांच्यासमोर स्वच्छ व शुद्ध गोदावरीचे दर्शन घडले पाहिजे. सर्वप्रथम महापालिकेने गोदावरी नदीत सोडले जाणारे सांडपाणी बंद केले पाहिजे. गोदावरी दूषित असेल, तर भाविक आचमनही करू शकणार नाही. भाविकांच्या श्रद्धेला तडा जाणार नाही, याची काळजी महापालिका व जिल्हा प्रशासनाने वाहिली पाहिजे. मुळात धरणातून थोडे-थोडे पाणी सोडत गेल्यास गोदावरीतील घाण पाण्याचा निचरा होऊ शकतो. गोदावरीची गटार होणार नाही, यासाठी महापालिकेने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे असल्याचेही रामसनेहीदास यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहराचा कायापालट होत असतो. त्यामुळे शहराला उपयुक्त ठरतील, असे प्रकल्प त्यानिमित्ताने उभे राहिले पाहिजे. अशा प्रकल्पांचे नाशिककर निश्चितच स्वागत करतील, असेही रामसनेहीदास यांनी सांगितले.

Web Title: Government administration slack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.