नाशिकची गोदावरी मृत्युशय्येवर
By Admin | Updated: August 8, 2014 02:09 IST2014-08-08T02:08:31+5:302014-08-08T02:09:02+5:30
नाशिकची गोदावरी मृत्युशय्येवर

नाशिकची गोदावरी मृत्युशय्येवर
नाशिक : नाशिकची गोदावरी नदी ही पूर्वी आजारी होती, ती आता मृत्युशय्येवर आहे. गोदावरी जर मृतप्राय झाली तर नाशिककरांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देतानाच जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी, गोदावरीचे प्रदूषण थांबवायचे असेल तर नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी थांबवून त्याचा वापर शेती-उद्योगासाठी करण्याचा सल्ला दिला.
किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज स्मारकात वसुंधरा महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी आगामी कुंभमेळ्याविषयी विचारमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेंद्रसिंह यांनी सांगितले, गोदावरी नदी स्नानायोग्य राहिली नसून ती नाला बनली आहे. कुंभमेळ्याला वैज्ञानिक आधार आहे. पर्वणी काळात सूर्य सिंह राशीत जात असल्याने त्यावेळी आॅक्सिजनचे प्रमाण वाढलेले असते. त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी राजा, प्रजा व ऋषीमुनी एकत्र येत असत आणि विचारांचे आदानप्रदान करत असत. परंतु आता कुंभमेळ्याला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. अंधविश्वास वाढला आहे.
महापालिकेने गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी खूप खर्च केला असला तरी सांडपाणी विसर्जनाची व्यवस्था वेगळी केली नाही तर कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. गोदावरी नदीवर बनविले जाणारे घाटही नदीतील नैसर्गिक रचनेला धोकादायक ठरत आहेत. गोदावरी किनारी पिंपळवृक्ष, कदंब, निंब आदि वृक्षांची लागवड केल्यास पाणीशुद्धीकरणासाठी त्याची मदत होऊ शकेल.
नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा वापर शेती व उद्योगासाठी करण्याचा सल्लाही डॉ. राजेंद्रसिंह यांनी दिला. यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक सचिन महाजन, भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, गोविंद माळी, राजेश पंडित, अमृता पवार यांनी सहभाग घेतला. वसंधुरा क्लबचे वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)