गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी
By Admin | Updated: August 1, 2014 01:10 IST2014-07-31T22:25:26+5:302014-08-01T01:10:06+5:30
गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी

गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी
कसबे सुकेणे : दारणा व गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज गुरुवारी गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. चांदोरी, सायखेड्यासह गोदाकाठच्या गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून, काठालगतच्या शेतांमध्ये पूरपाणी घुसले आहे.
सोमवार व मंगळवारी झालेल्या धुव्वाधार पावसामुळे दारणा धरणातून मंगळवारी संध्याकाळी २० हजार क्युसेक, तर गंगापूर धरणांतून करण्यात आलेल्या विसर्गामुळे गोदाकाठावर पूरस्थिती निर्माण झाली. चांदोरी- सायखेडा गावांना जोडणाऱ्या पुलापर्यंत पाणी पोहोचल्याने नागरिकांची धावपळ उडाली. नदीत वाहून आलेल्या पाणवेली अडकल्याने पाण्याच्या प्रवाहात अडचणी निर्माण झाल्या होत्या. चाटोरी, सायखेडा, चांदोरी शिंगवे आदिंसह गोदाकाठालगतच्या शेतीत पूरपाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गोदाकाठाने सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दिंडोरी तालुक्यात झालेल्या दोन दिवसांच्या मुसळधार
पावसानंतर बाणगंगेला बुधवारी पहिला पूर आला.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहू लागले आहे. बाणगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी बाणगंगेला मोठा पूर आला. या पावसाळ्यातील पहिला पूर आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती.
पुराचे पाण्याच्या वेग मोठा असल्याने या पुरात मोठ्या प्रमाणावर पानवेली वाहून गेल्या. ओणे
गावाच्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने ओणे गावाचा ओझर-सुकेणेशी संपर्क तुटला होता.
त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. (वार्ताहर)