जयघोष : पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, निवृत्तिनाथ महाराज की जय...

By Admin | Updated: January 10, 2015 00:26 IST2015-01-10T00:26:13+5:302015-01-10T00:26:27+5:30

दिंड्यांचे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान

Glory: Pundalik Varade Hari Vitthal, Nivittinath Maharaj's Jai ... | जयघोष : पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, निवृत्तिनाथ महाराज की जय...

जयघोष : पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, निवृत्तिनाथ महाराज की जय...

जायखेडा : गेल्या ६० वर्षांची अखंड परंपरा असलेली जायखेडा ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी टाळमृदंगाच्या गजरात व ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री निवृत्तिनाथ महाराज की जय’च्या नामघोषात येथून रवाना झाली.
खान्देशातील छोट्या-मोठ्या शेकडो दिंड्या जायखेडा येथे दाखल झाल्यानंतर वैकुंठवासी कृष्णाजी माउली जायखेडकर यांच्या निवासस्थानापासून या दिंडीचे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान झाले. पदयात्रेत सहभागी हजारो वारकरी बांधवांनी कृष्णाजी माउलींच्या समाधिस्थळी जाऊन दर्शन घेतले. कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी हजारो वारकरी पदयात्रेद्वारे हरिनामाचा जयघोष करीत त्र्यंबककडे रवाना झाले. कपाळी केशरी गंध, डोक्यावर टोपी, अंगात अंगरखा, कमरेला धोतर, खांद्यावर भगवी पताका व मुखात नामस्मरण असलेले वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पदयात्रा मार्गावरील विविध गावांमध्ये पदयात्रेत सहभागी वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येते. गावोगावी मुक्काम करीत भजन, कीर्तन, भारुड, प्रवचनांद्वारे समाजप्रबोधन करीत दिंडी निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होणार आहे. १९५७ साली गुरुवर्य कृष्णाजी माउली जायखेडकर यांनी अवघ्या पाच व्यक्तींना सोबत घेऊन या दिंडीस सुरुवात केली. बघता बघता या छोट्याशा रोपट्याचे आता विशाल अशा वटवृक्षात रूपांतर झाले आहे. धुळे, नंदुरबार, जळगावसह नाशिक जिल्ह्यातील हजारो वारकरी भाविक या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत आहेत. सर्वात मोठी व शिस्तबद्ध दिंडी म्हणून या दिंडीचा नावलौकिक आहे.
जायखेडा येथून निघालेल्या दिंडी सोहळ्यात महिला वारकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. वर्षानुवर्षे अखंडपणे सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी वेश, टाळ, पताका व हरिपाठ येणे आवश्यक आहे. तसेच व्यक्ती व्यसनमुक्त असणे गरजेचे आहे. तंबाखू किंवा तत्सम धूम्रपान करणाऱ्यास दंड असल्याने व्यसनमुक्तीचे मोठे कार्य या माध्यमातून होत आहे.
निताणे, करंजाड, केरसाने, कपालेश्वर, कंधाणा, विसापूर, बेज, कळवण, ओतूर, मुळाणे, बाबापूर, आंबेवणी, तळेगाव, पिंपळणारे, म्हसरूळ, पंचवटी, नाशिक, पिंपळगाव बहुला, धडगाव, गणेशगाव, बंबईवाडी असा प्रचार करीत ही पदयात्रा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधिस्थळी नतमस्तक होणार आहे.
वै. स्वानंद सुखनिवासी कृष्णाजी माउली पादुका ठेवलेला भव्य रथ या पदयात्रेत सामील करण्यात
आला आहे. माउलींच्या पादुका दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Glory: Pundalik Varade Hari Vitthal, Nivittinath Maharaj's Jai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.