‘हे गणराया यांना सुबुद्धी दे’
By Admin | Updated: December 22, 2015 23:47 IST2015-12-22T23:46:11+5:302015-12-22T23:47:59+5:30
इंदिरानगर बोगदा : निनावी फलक चर्चेत

‘हे गणराया यांना सुबुद्धी दे’
इंदिरानगर : सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी एकतर्फी निर्णय घेऊन बंद केलेला इंदिरानगर उड्डाणपूल बोगदा सुरू करण्यासाठी अनेकविध आंदोलने करूनही पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहून ‘हे गणराया यांना सुबुद्धी दे’ असा निनावी फलक बोगद्याजवळ लावण्यात आल्याने शहरात चर्चेचा विषय झाला आहे. या फलकामुळे संबंधिताना सुबुद्धी मिळेल की नाही हे समजू शकले नसले तरी, वाहनचालकांचा फेरा मात्र सुटलेला नाही.
मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाला इंदिरानगर जवळ बोगदा करण्यात आलेला असून, हा बोगदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर व तेथील वाहतुकीचा विचार करूनच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. परंतु सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात पोलीस प्रशासनाने या बोगद्यातून इंदिरानगरहून गोविंदनगरकडे ये-जा करणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून बोगद्याच्या तोंडाशी सीमेंटचे गर्डर टाकले आहेत. बोगदा बंद झाल्याने इंदिरानगर-गोविंदनगरकडे ये-जा करणारी वाहतूक बाधित झाली असून, वाहनधारकांना मोठा फेरा मारावा लागत आहे. हा बोगदा वाहनांसाठी खुला करावा यासाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येऊन पोलीस आयुक्तांना निवेदनही देण्यात आले. परंतु पोलीस आपल्या भूमिकेवर आजही ठाम आहेत. त्यामुळे सोमवारी हा बोगदा वाहनांसाठी खुला करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. लोकशाही मार्गाने आंदोलने करूनही दखल घेतली जात नसल्याचे पाहून काही नागरिकांनी इंदिरानगर बोगद्याला लागून असलेल्या श्री शनि मंदिराच्या कुंपणावरच ‘हे गणराया यांना सुबुद्धी दे’ असा भला मोठा फलक लावला आहे. मंगळवारी सकाळी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे फलकाने लक्ष वेधून घेतले.