घोटी : दारणा धरणाचे पाणी सोडण्यास विरोध
By Admin | Updated: October 23, 2015 00:09 IST2015-10-22T23:55:20+5:302015-10-23T00:09:43+5:30
शिवसेनेचा रास्ता रोको

घोटी : दारणा धरणाचे पाणी सोडण्यास विरोध
घोटी : इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून मराठवाड्यासाठी पाण्याचे आवर्तन करू नये, या मागणीसाठी गुरुवारी इगतपुरी तालुका शिवसेनेच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याबाबत आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र पवार यांना दिले. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार हेमंत गोडसे यांनी केले.
याबाबत वृत्त असे की, मराठवाड्याला नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्यात येणार आहे. यातील इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून सुमारे ३२४० दलघफू पाणी सोडण्यात येणार आहे. या धरणावर तालुक्याची पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची भिस्त अवलंबून असल्याने या धरणातून पाणी सोडल्यास आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने या धरणातून पाणी सोडण्यास संपूर्ण तालुक्यातून विरोध होत आहे.
दरम्यान, शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतलेला पाणी सोडण्याचा निर्णय तालुक्यातील जनतेवर अन्यायकारक असल्याने हा निर्णय मागे घेण्यात यावा व दारणा धरणातून पाणी सोडू नये, या मागणीसाठी आज इगतपुरी तालुका शिवसेनेच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनात खासदार हेमंत गोडसे यांच्यासह तालुकाप्रमुख भगवान आडोळे, उपतालुकाप्रमुख समाधान वारुंगसे, समाधान बोडके, अशोक सुरुडे, कुलदीप चौधरी, राजेंद्र नाठे, सूर्यकांत भागडे, संजय आरोटे, मोहन बऱ्हे, कावजी ठाकरे, केरू देवकर, रमेश धांडे, माजी आमदार शिवराम झोले, नंदलाल भागडे, पांडुरंग गांगड, विनोद भागडे आदिंसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)