ओसाड माळरानावर बागडतात हरणे

By Admin | Updated: May 4, 2016 01:05 IST2016-05-03T23:53:44+5:302016-05-04T01:05:17+5:30

अतिचराई : चारा-पाण्याअभावी अस्तित्व धोक्यात; वन विभागाचे दुर्लक्ष

To get rid of the odd bogs, | ओसाड माळरानावर बागडतात हरणे

ओसाड माळरानावर बागडतात हरणे

संजय दुनबळे  नाशिक
सातत्याने पडणारा दुष्काळ, वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे वनसंवर्धनाकडे होणारे दुर्लक्ष, अतिचराई अशा वेगवेगळ्या कारणांमुळे येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, सोमठाणे, देवदरी, खरवंडी या गावांच्या परिसरातील साडेसात हजार हेक्टरवरील वनक्षेत्राचे ओसाड माळरान होऊ लागले असून, चारा आणि पाणीटंचाईमुळे या परिसरातील हरणांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जंगलाचे वाळवंट होऊ लागल्यानंतर आता वन विभागाला जाग आली आहे. सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र राखीव करण्यात आले असून, हा भाग अभयारण्य म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने वन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. नेहमीच दुष्काळी स्थिती असलेल्या येवला तालुक्यातील उत्तरपूर्व भागातील राजापूर, ममदापूर, सोमठाणे, देवदरी, खरवंडी या गावांच्या परिसरात साडेसात हजार हेक्टरवर राखीव वनक्षेत्र आहे. या परिसरात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात हरणांचे वास्तव्य आहे. मोकळ्या वातावरणात स्वछंदपणे बागडणारे हरणांचे कळप पाहण्याचा आनंद काही औरच असतो. अनेक हौशी पर्यटक या परिसरात हरणे पाहण्यासाठी येत असतात; मात्र काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण सातत्याने कमी झाल्यामुळे वन परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत. यामुळे हरणांच्या पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न निर्माण
झाला आहे.वन विभागाने वन परिसरात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांमध्ये टॅँकरने पाणी टाकावे लागते. वन विभागाकडे यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे बहुतेकवेळा स्वयंसेवी संस्था आणि दानशुरांवरच टॅँकरची मदार असते. राजापूर वनक्षेत्र परिसरात वन विभागाने महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळाच्या अनुदानातून बोरअवेल करून त्यावर सौरऊर्जेवर चालणारा पंप बसवून जवळच कृत्रिम पाणवठा तयार केला आहे. या बोअरवेलला थोडेफार पाणी येत असले तरी त्यावर हरणांची तहान भागण्यापेक्षा ग्रामस्थच पाण्यावर डल्ला मारत असल्याचे दृश्य पाहावयास मिळते. पिण्याच्या पाण्याबरोबर हरणांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. वन परिसरात मेंढ्या आणि गुरांची सातत्याने चराई होत असते. अनेक वर्षांपासून हे प्रकार सर्रास सुरू आहेत.
सातत्याने असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे दिवसेंदिवस वन परिसरातील हिरवळ कमी झाली आहे. यावर्षी तर या परिसरात सरासरीपेक्षा केवळ ५ ते १० टक्केच पाऊस झाल्याने हिरवळ आलीच नाही; जी काही आली ती अल्पजीवी ठरली. विहिरींनी तळ गाठल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनीही यावर्षी उन्हाळी पिके घेतली नाहीत. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात दिसणारा हिरवा घास यावर्षी दिसलाच नाही. यापूर्वी हरणांचा कळप रात्रीच्या वेळी शेतात घुसून पिकांवरील हिरवा चारा खाऊन गुजराण करत असत.
यावर्षी मात्र त्यांच्या नशिबी तेही नसल्याने या वन परिसरातील हरणांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
चाऱ्याच्या शोधात हरणांना दूरदूरवर भटकंती करावी लागत आहे. पाणी आणि चाऱ्याच्या शोधात अनेक हरणांचे आपोआपच स्थलांतर होत आहे. वन विभागाने वेळीच उपाययोजना करून हरणांचे होणारे स्थलांतर रोखणे गरजेचे आहे.

Web Title: To get rid of the odd bogs,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.