पश्चिम भागात वाढत्या चोऱ्या मालेगावी सर्वसामान्य नागरिक चिंतित
By Admin | Updated: June 24, 2014 00:24 IST2014-06-22T23:21:04+5:302014-06-24T00:24:00+5:30
मालेगाव : शहराच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर घरफोड्या आणि भुरट्या चोऱ्या होत आहेत.

पश्चिम भागात वाढत्या चोऱ्या मालेगावी सर्वसामान्य नागरिक चिंतित
मालेगाव : शहराच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर घरफोड्या आणि भुरट्या चोऱ्या होत आहेत. यातील कित्येक चोऱ्यांचा तपास महिनोंमहिने लागत नसल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. या वाढत्या चोऱ्यांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, घरासह मालमत्तेचे रक्षण करावे कसे? असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.
शहरात कॅम्प व छावणी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणावर घरफोड्या, भुरट्या चोऱ्या, महिलांच्या अंगावरील दागिने ओरबडणे, दुचाकी चोरी, तपासणीच्या नावाने हातातील पैसे व दागिने चोरी, बँकेच्या तसेच बाजारात विविध कारणांनी वाहनांमधून केली जाणारी चोरी आदि घटना नियमित होत आहेत. यात मागील वर्षी सोनसाखळी चोरीच्या घटनेनेचे तीव्र पडसाद उमटल्याने पोलिसांनी काही संशयितांवर पाळत ठेवल्याने सोनसाखळी किंवा दागिने ओरबडण्याच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र घरांचे कुलूप तोडून होणाऱ्या घरफोडींच्या घटना सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी वैतागून सहकुटुंब बाहेरगावी जाणे टाळले आहे. त्याऐवजी घराला कुलूप न लावता एखादी व्यक्ती घरी ठेवत आहेत. वर्षभरात घडलेल्या चोरीच्या घटनांमधील बोटावर मोजण्याइतक्या घरफोडींचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मोठी घरफोडी केली त्याचे गुन्हे दाखल होऊन प्रसंगी मोठा गाजावाजा होऊन पोलिसांवर गुन्हे उघड करण्याच्या दडपणातून आरोपींना पकडावे लागते. त्यापेक्षा भुरट्या चोऱ्या केल्यास नागरिक पोलिसांवरील अविश्वासाने तसेच केलेल्या तक्रारीचा फायदा न होता नसत्या चौकशींना किंवा प्रश्नांना वैतागल्याने चोरीच्या घटनांची माहिती देणे टाळतात. यामुळे या चोरांनी भुरट्या चोऱ्यांवर भर दिला आहे.
नागरिकांना प्रचंड उकाड्यामुळे व अवेळीच्या भारनियमनामुळे रात्री झोपताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या लागतात. त्यामुळे या चोरांचे चांगलेच फावले आहे. चोरांनी उघड्या खिडक्यांमधून मोठ्या प्रमाणावर वस्तू, कपडे, पैसे, मोबाइल यासारख्या वस्तू चोरण्यास सुरुवात केली आहे. यात गेल्या चार ते पाच दिवसांत सटाणा नाका परिसरातील नगरसेवकाच्या घरातून पॅन्ट गळाच्या सहाय्याने काढून त्यातील पैसे व मोबाइल, सोयगावी एका घराच्या खिडकीतून घड्याळ, बोरसेनगर परिसरात पितळी भांडे, कॅम्प भागातील अनेक नववसाहतीत मोबाइल, कॅमेरा आदि साहित्यांची चोरी करण्याच्या घटना घडल्या
आहेत.
तर गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी एकाच दिवशी स्टेट बँक चौकात पोलीस असल्याचे सांगून झालेली लुबाडणूक, सटाणा नाका येथे महिलेल्या गळ््यातील पळविलेली लाख रुपये किमतीचे दागिने, नामपूर रस्त्यावरील वसाहतीत बंद घराचे कुलूप तोडून करण्यात आलेली घरफोडी आदि मोठ्या घटनांसह दोन ते तीन किरकोळ चोरीच्या घटना घडल्या आहेत.
यामुळे नागरिक वैतागले असून, यातून संरक्षण कसे करावे? नागरिकांनी विशेषत: एकट्या महिलांनी घरात राहावे कसे? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या चोरट्यांना पायबंद घालून होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालावा व चोरट्यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.