उद्याने कोमेजली; बालके रुसली
By Admin | Updated: May 6, 2016 00:31 IST2016-05-05T22:53:44+5:302016-05-06T00:31:18+5:30
उन्हाळी सुटी : अपुऱ्या-नादुरुस्त खेळण्यांचे ग्रहण, पालिका प्रशासनाची उदासीनता

उद्याने कोमेजली; बालके रुसली
नाशिक : महापालिकेने मोकळ्या भूखंडांवर उद्याने विकसित केली, मात्र या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनासह नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाल्यामुळे शहरातील मुख्य उद्यानांसह नववसाहतींमधील उद्यानेही केवळ नावापुरतीच राहिली आहेत. उद्याने बकाल झाली असून शहराची फुफ्फुसे निकामी बनत चालल्याने संताप व्यक्त होत आहे. उद्यानांमध्ये मद्यपींच्या ओल्या पार्ट्या व पत्त्यांचे डाव रंगविले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.एकीकडे शहरातील सत्ताधारी ‘नवनिर्माण’च्या पक्षप्रमुखांनी वन विभागाच्या बहरलेल्या उद्यानात वनौषधी उद्यान विकसित करण्यासाठी मंत्र्यांच्या दरबारी बैठका घेत मंजुरी मिळविली आहे; मात्र दुसरीकडे त्यांच्या अर्थात पालिकेच्या अखत्यारित असलेली उद्याने भकास झाली आहेत. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी उद्यानाच्या नशिबी वर्षानुवर्षांपासून दुरवस्था कायम असल्याने बालगोपाळांवरही उदास झाली आहेत. ऐन उन्हाळी सुटीत मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या बालकांचा प्रचंड हिरमोड होत असल्याने उद्यानांचे नवनिर्माण होणार तरी कधी, असा प्रश्न संतप्त नाशिककरांकडून केला जात आहे.
सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांनी आपल्या आगामी नाशिक दौऱ्यात पालिकेच्या उद्यानांना भेटी देऊन ‘याचि देही याचि डोळा’ समस्यांची पाहणी करण्याची मागणी त्रस्त नाशिककरांनी केली आहे. त्याशिवाय पालिकेच्या प्रमुखांना उद्यानांची दुरवस्था थांबविण्याचा ‘मुहूर्त’ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. सध्या उन्हाळी सुट्यांचा हंगाम असल्यामुळे संध्याकाळ होताच शहरातील उद्याने गर्दीने फुलू लागतात.
बालगोपाळ व त्यांचे पालक मोठ्या आशेने मौजमजेसाठी आपली पावले उद्यानांकडे वळवितात; मात्र उद्यानांची पायरी चढल्यानंतर त्यांच्या पदरी आनंदाऐवजी निराशा पडते. कारण उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था, मोडकळीस आलेली बाके, फुटलेले पथदीप, कचऱ्याने तुडुंब भरून वाहणाऱ्या कुंड्या, डासांचा उपद्रव, अपुरे बाक अशा अनेक समस्यांचे ग्रहण उद्यानाला लागले आहे.