नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पाणीसाठा कमी हाेत गेला तसेच पावसाने ओढ दिल्याने महापालिकेने पंधरा दिवसांपूर्वी पाणी कपातीचा निर्णय घेतला हाेता. त्यावेळी धरणात जवळपास ३३ टक्के साठा शिल्लक होता, तसेच गंगापूर आणि त्र्यंबकेश्वर, आंबाेली परिसरात पुरेसा पाऊस नसल्याने जिल्हा प्रशासनाचेदेखील तोंडचे पाणी पळाले होेते. महापालिकेच्या नाशिकरोड भागाला दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तेथे गेल्या नोव्हेंबरमध्ये चेहेडी बंधाऱ्यात दूषित पाणी आल्याने नगरसेवकांच्या विरोधामुळे या भागातून पाणी घेणे बंद करण्यात आले. त्यामुळे दारणा धरणात ३८३ दशलक्ष घनफूट पाणी असतानादेखील गंगापूर धरणातून नाशिकरोड भागाला पाणी देण्यात आले. त्यामुळे गंगापूर धरणातील पाणी आरक्षण संपुष्टात आले त्यातच पावसाने ओढ दिल्याने महापालिकेला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला.
गेल्या आठवड्यात बुधवारपासूनच पाणी कपात करण्यात येणार होती. मात्र, त्यादिवशी बकरी ईद असल्याने गुरुवारी (दि.२२) पाणी कपात करण्यात आली. त्यानंतर मात्र आता यंदापासून दर बुधवारी (दि.२८) पाणी कपात करण्यात येणार आहे. महिनाभर दर बुधवारी कपात कायम राहील, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.