गणेश मंडळांवर कडाडली ‘दामिनी’
By Admin | Updated: September 5, 2014 00:32 IST2014-09-04T22:47:41+5:302014-09-05T00:32:19+5:30
गणेश मंडळांवर कडाडली ‘दामिनी’

गणेश मंडळांवर कडाडली ‘दामिनी’
नाशिक : अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या गणेश मंडळांवर महावितरणचे दामिनी पथक लक्ष ठेवून असून, या पथकाने ३०हून अधिक गणेश मंडळांची अनधिकृत वीज जोडणी उघडकीस आणली आहे.
गणेश मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी महावितरणने दामिनी पथक तयार केले आहे. महिला सदस्य असलेल्या या पथकाने अनेक गणेश मंडळांना भेटी देत अधिकृत वीज जोडणी घेण्यास प्रवृत्त केले आहे. गणेशोत्सवादरम्यान, अधिकृत वीज पुरवठा घेण्याकरिता महावितरणने गणेश मंडळांना आवाहन केले होते. मात्र, काही मंडळांनी त्यास बगल दिल्याचे आढळले आहे. अनधिकृतपणे वीज जोडणी घेतलेल्या गणेश मंडळांवर नजर ठेवण्याचे काम महावितरणचे दामिनी पथक करीत आहे. आतापर्यंत दामिनी पथकाने ३० हून अधिक गणेश मंडळांचे वीज जोडांची तपासणी केली असून, त्यांना अधिकृत वीज जोडणी घेण्यास भाग पाडले आहे. गणेशोत्सवापर्यंत ही कार्यवाही अशीच सुरू राहणार आहे.
विशेष म्हणजे काही गणेश मंडळांनी घरातूनच वीज घेतल्याचेही महावितरणला आढळून आले आहे. महावितरण सण व उत्सवाकरिता वाजवी दराने म्हणजे ३.२७ पैसे प्रती युनिट या दराने वीजपुरवठा करीत आहे. गणेशोत्सवासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी १००० रुपये अनामत रक्कम महावितरणकडे जमा करावी लागते जी गणेशोत्सव संपल्यानंतर अर्जदारास परत मिळते. आतापर्यंत नाशिक शहरातील जवळपास १७० हून अधिक गणेश मंडळांनी महावितरणकडून वीजपुरवठा घेतला आहे. गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, तसेच सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. दामिनी पथक यासाठी कार्यरत आहे. (प्रतिनिधी)