पत्रा-पत्रीमुळे गाजतेय विद्यापीठ
By Admin | Updated: September 21, 2014 00:39 IST2014-09-20T21:51:12+5:302014-09-21T00:39:01+5:30
पत्रा-पत्रीमुळे गाजतेय विद्यापीठ

पत्रा-पत्रीमुळे गाजतेय विद्यापीठ
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठ सध्या लेटरबॉम्बमुळे चांगलेच गाजत आहे. विद्यापीठातून राजभवनात, राजभवनातून विद्यापीठात आणि विद्यापीठातून कर्मचाऱ्याच्या घरी पत्रा-पत्रीचा खेळ सुरू झाल्याने विद्यापीठातील अंतर्गत कलह यानिमित्ताने समोर आला आहे.
विद्यापीठाचे कामकाज, येथील अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार आणि त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीविषयी गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठातील एक कर्मचारी सातत्याने पत्रव्यवहार करीत असल्याने राजभवनाने या पत्रांची अनेकदा दखल घेत वारंवार अनेकांची चौकशीदेखील केलेली आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांच्या नावानेदेखील तक्रारी झाल्याने एकूणच विद्यापीठ सातत्याने राजभवनाच्या टीकेला सामोरे जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा परिपाठ सुरूच आहे.
या साऱ्या प्रकरणाला कंटाळलेल्या राजभवनातील प्रशासन विभागाने अखेर संबंधित कर्मचाऱ्याचा विद्यापीठानेच बंदोबस्त करावा, असा निर्वाणीचा निर्णय दिल्यानंतर विद्यापीठालाही दिलासा मिळाला. त्यानंतर विद्यापीठाने संबंधित कर्मचाऱ्यास नोटीस बजावलीदेखील; परंतु संबंधिताने नोटीस न स्वीकारल्याने नोटीस त्याच्या घरच्या पत्त्यावर पाठविण्यात आली. विद्यापीठाची तक्रार करून बदनामी केल्याचा आणि त्यास आपण जबाबदार असून, उत्तर देण्यात यावे, असा उल्लेख त्या नोटिसीत असल्याचे समजते.
अर्थात, विद्यमान कुलगुरू आणि माजी कुलसचिवांविषयी संबंधित कर्मचाऱ्याने गंभीर आरोप केल्यानंतरच कुलगुरूंनी हे पाऊल उचलले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण यापूर्वीच्या कोणत्याही तक्रारीविषयी कुलगुरूंनी कोणताही आक्षेप घेतलेला नव्हता. आत्ताचीच तक्रार त्यांना का झोंबली हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
वास्तविक, यापूर्वी हाच कर्मचारी कुलगुरूंना अनेक निर्णयांत सहाय्यभूत ठरल्याचे साक्षीदार अवघे विद्यापीठ आहे. काही निर्णय तर संबंधित कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतरच घेतले गेले; परंतु प्रकरण जेव्हा अंगलट आले तेव्हा कुलगुरूंनी स्वत:च सारे प्रकरण उघड केले होते. या घटनेनंतर विद्यापीठातील कामगार संघटनांमध्ये फूट पडून तीन संघटना तयार झाल्या आहेत. प्रकरण काहीही असो कुलगुरू, कुलसचिवांच्या कोणत्या तक्रारीनंतर कुलगुरूंना खडबडून जाग आली हे मात्र गुलदस्यातच आहे. (प्रतिनिधी)