आवक वाढल्याने फळभाज्या कोसळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:19 IST2021-08-21T04:19:13+5:302021-08-21T04:19:13+5:30
फळभाज्यांचे दर घसरले असून, भाजीपाल्याचा उत्पादन व वाहतुकीचा खर्चदेखील सुटत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ...

आवक वाढल्याने फळभाज्या कोसळल्या
फळभाज्यांचे दर घसरले असून, भाजीपाल्याचा उत्पादन व वाहतुकीचा खर्चदेखील सुटत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांना कवडीमोल बाजारभाव मिळत आहे.
बाजार समितीत भेंडी, वांगी, दोडका, भोपळा, शिमला मिरची, टोमॅटो यासारख्या सर्व फळभाज्या विक्रीसाठी दाखल होत आहेत, मात्र बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या बाजारभावात शेतमाल विक्री करावा लागत आहे. बाजार समितीत विक्रीला आलेल्या शिमला मिरचीला पाच रुपये, भोपळा दोन, दोडका पाच, वांगी सहा व भेंडी सात रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळत आहे. फळभाज्या स्वस्त दरात मिळत असल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर जाणवला आहे तर काही शेतकरी थेट मुंबई, मुंबई उपनगरात शेतमाल विक्रीसाठी नेत असल्याने उठाव कमी झाला आहे. परिणामी स्थानिक व्यापारीदेखील शेतमाल खरेदी करत नसल्याने बाजार घसरले असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.