सन्मानजनक तडजोडीनंतरच आघाडी
By Admin | Updated: August 4, 2014 00:58 IST2014-08-03T23:05:46+5:302014-08-04T00:58:49+5:30
सन्मानजनक तडजोडीनंतरच आघाडी

सन्मानजनक तडजोडीनंतरच आघाडी
नाशिक : कॉँग्रेसने महाराष्ट्रात समविचारी पक्षांना सोबत घेऊन पाच वेळा विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. युती सरकारच्या कारभारानंतर जनतेने लोकशाही आघाडीवर विश्वास टाकला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. आता सहाव्यांदा आघाडीचा प्रस्ताव आला तर सन्मानजनक तडजोडीसाठी कॉँग्रेस तयार आहे; परंतु कोणत्याही अटी-शर्ती स्वीकारल्या जाणार नाहीत, असे ठाम प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात बोलताना केले. दरम्यान, मेळाव्यात कॉँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मात्र राष्ट्रवादीवर सडकून टीका करत स्वबळाचा नारा दिला.
महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीनंतर कॉँग्रेसने पराभवाचे विश्लेषण-चिंतन केले. आता महाराष्ट्रभर विभागीय मेळावे घेतले जात आहेत. प्रत्येक ठिकाणी आता कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकले आहे. नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे. राज्यात आघाडीबाबतही मते आजमावण्यात आली. त्याचा अहवाल राज्याचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्याकडे देण्यात आला आहे. राष्ट्रवादीसोबत कॉँग्रेसने पाच निवडणुका लढविल्या. त्यात काही बरे-वाईट अनुभव आले; परंतु आता आघाडीचा प्रस्ताव आला तर कोणत्याही अटी-शर्तीविना सन्मानजनक तडजोडीनंतरच तो स्वीकारला जाईल, असे सांगत चव्हाण यांनी आघाडीबाबत आत्ताच काही बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना चव्हाण यांनी सांगितले, लोकशाहीची परंपरा बाजूला ठेवत भाजपाने एका व्यक्तीच्या हाती पक्षाची सूत्रे दिली आहेत. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावर हुकूमशाही पद्धतीने कारभार चालविला जाणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या प्रगतीचे दाखले देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचे उत्पन्न उत्तर प्रदेशपेक्षाही ४० टक्के जास्त आहे. (पान ८ वर)
महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र ही परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंत बनली आहे. गुजरात मॉडेलच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जाहीर चर्चा होऊन जाऊ द्या, असे आव्हानही चव्हाण यांनी दिले. गेल्या तीन वर्षांत अनेक अडचणी येऊनही महाराष्ट्र सरकारने जनतेचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाच्या चांगल्या योजना राबविल्या. शेतकऱ्यांना १२ हजार कोटींचा निधी दिला. अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले. पुढच्या आठवड्यात एकाच दिवशी एकाच वेळी राज्यात साडेतीन हजार बंधाऱ्यांची उद्घाटने करण्यात येणार आहेत. टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला. प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीत अपप्रचारामुळे पक्षाला पराभव पाहावा लागला; परंतु आता वातावरण बदलते आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये कॉँग्रेसने यश संपादन केले आहे. मोदी सरकारचा कारभार दोनच महिन्यांत जनतेला कळला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरे जायचे आहे. निवडणुकीत समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजे, ही कॉँग्रेसची भूमिका आहे. परंतु कॉँग्रेसला कमी लेखले जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. बारामती, कोल्हापूर, सातारा व माढा येथील विजय कुणामुळे झाले हे त्यांनी तपासून पाहावे. कॉँग्रेस एकही जागा सोडणार नाही. सन्मानजनक तडजोडीस कॉँग्रेस तयार आहे; अन्यथा २८८ जागा लढविण्याची तयारी असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याचाही निषेध केला. दरम्यान, कॉँग्रेसची पहिली यादी लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार असून येत्या ११ आॅगस्टपर्यंत इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मोहनप्रकाश, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, पद्माकर वळवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
मेळाव्याच्या प्रारंभी उत्तर महाराष्ट्रातील कॉँग्रेस जिल्हाध्यक्षांनी मनोगत व्यक्त करत स्वबळावर लढण्याचा नारा दिला. यावेळी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमलताई व्यवहारे, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला माळीण गावातील दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन शहर कॉँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष शरद अहेर यांनी केले. माजी शहराध्यक्ष अश्विनी बोरस्ते यांनी आभार मानले. व्यासपीठावर माजी मंत्री बळीराम हिरे, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार शिरीष चौधरी, आमदार जयंत ससाणे, आमदार सुधीर तांबे, आमदार निर्मला गावित, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी महापौर दशरथ पाटील, प्रदेश सचिव संजय चौपाणे, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, चंद्रकांत दायमा, विजय नवल पाटील, राहुल दिवे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
इन्फो
...नाहीतर आग्यामोहोळ उठेल
माणिकराव ठाकरे यांनी कॉँग्रेसचे कार्यकर्ते हे एक आग्यामोहोळ असून, ते उठले तर समोरच्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नाव न घेता दिला. चव्हाण- ठाकरे यांनी यावेळी सेना-मनसेवरही टीका केली. मनसेने नाशिकमध्ये काय केले, असा सवाल करत माणिकराव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना राज्य चालवायचे कसे याची काडीचीही माहिती नसल्याची टीका केली. दरम्यान, राज्यात आघाडी झाल्यानंतर कुणी नेता-पदाधिकारी वेगळी वाट चालणार असेल तर अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
इन्फो
पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी थेट संवाद
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात येत्या विधानसभा निवडणुकीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केले. प्रदेश कॉँग्रेसनेही प्रत्येक गाव-तालुका पातळीवरील पदाधिकारी व प्रमुख कायकर्ते यांचे भ्रमणध्वनी क्रमांक मागविले असून, निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री-प्रांताध्यक्ष स्वत: थेट संवाद साधून परिस्थिती जाणून घेणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.