थंडीत विद्यार्थी स्वेटरविनाच
By Admin | Updated: January 8, 2017 01:05 IST2017-01-08T01:05:29+5:302017-01-08T01:05:50+5:30
आरोप : आदिवासी विकास विभागाचा गोंधळ सुरूच

थंडीत विद्यार्थी स्वेटरविनाच
नाशिक : आदिवासी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या हिवाळ्यातही स्वेटर मिळालेले नाहीत. यामुळे ऐन थंडीच्या कडाक्यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थी थंडीत कुडकुडत असून, विद्यार्थ्यांना स्वेटर मिळावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार यांनी आयुक्तांकडे केली आहे.
रेनकोट निविदाचा घोळ झाल्याने विद्यार्थ्यांना ऐन पावसाळ्यात रेनकोटपासून वंचित रहावे लागले होते. इतकेच नव्हे तर सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना स्वेटर न मिळाल्याने थंडीतच कुडकुडत बसावे लागत आहे. आताही आदिवासी विकास विभागामार्फत थंडीत पुरविल्या जाणाऱ्या स्वेटरचा असाच सावळा गोंधळ झाला. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना हिवाळ्यात स्वेटर मिळालेले नाही. जिल्ह्णात थंडीचा कडाका वाढत आहे, गेल्या आठवडाभरात तर थंडीचा पारा खाली उतरलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढलेली आहे.
या परिस्थितीत आश्रम-शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वेटर नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. स्वेटर नसल्याकारणाने विद्यार्थ्यांचे आजाराचे प्रमाणदेखील वाढले आहेत. यातच आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. थंड पाण्याने त्यांना आंघोळ करावी लागते. खुद्द आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्या जिल्ह्यात जव्हार आश्रमशाळेतदेखील विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याचे माध्यमांमधून दाखविण्यात आले.
मंत्र्यांच्या जिल्ह्यात असे असेल, तर राज्यातील आश्रमशाळांमध्ये काय परिस्थिती असेल. यासाठी थंडीचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना तत्काळ स्वेटर मिळाली पाहिजेत, अशी मागणी डॉ. पवार यांनी केली. (प्रतिनिधी)