इगतपुरीत एकाच रात्री चार घरफोड्या
By Admin | Updated: July 25, 2014 00:37 IST2014-07-24T22:25:57+5:302014-07-25T00:37:47+5:30
नागरिक भयभीत : ९० हजारांचा ऐवज लंपास

इगतपुरीत एकाच रात्री चार घरफोड्या
इगतपुरी : येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खालची पेठ परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरांतून हजारोंचा ऐवज लांबवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खालची पेठ येथील दत्तात्रय नामदेव कुशारे हे वर्षश्राद्धासाठी कुंदेवाडी येथे गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरातील पावणेतीन तोळे सोन्याची पोत, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, सोन्याची रिंग असा सुमारे ८० ते ९० हजार रुपये किमतीचा ऐवज लांबवला. त्यानंतर चोरट्यांनी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी विजयसिंग परदेशी हे कल्याण येथे गेल्याची संधी साधत त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले ११ हजार रुपये रोख, ११९५ व २१९५ रुपये किमतीचे घड्याळ लांबवले. चोरट्यांनी यानंतर याच गल्लीतील यशवंत भंडारी, पंकज ननावरे यांच्या घरातील ऐवज चोरून नेला. एकाच रात्री चार ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)