दिंडोरीतील चारही धरणे कोरडीठाक

By Admin | Updated: June 27, 2016 00:29 IST2016-06-26T22:07:38+5:302016-06-27T00:29:34+5:30

दुष्काळ : वणी, चांदवड, पिंपळगाव, ओझरसह अनेक गावांचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची भीती

Four dams in Dindori are dry | दिंडोरीतील चारही धरणे कोरडीठाक

दिंडोरीतील चारही धरणे कोरडीठाक

दिंडोरी : धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या दिंडोरी तालुक्याला यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, यंदा दोन नक्षत्र कोरडी गेल्याने भयावह स्थिती निर्माण झाली आहे. सहापैकी चार धरणे कोरडीठाक झाली असून, मृत पाण्याचा साठाही दिवसागणिक कमी होऊ लागला आहे. ओझरखेड व पालखेड धरणावर विसंबून असलेल्या शेकडो गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.ओझरखेड धरणात केवळ मृत पाणीसाठा असून, त्यातही दिवसागणिक पाणी कमी होत असल्याने वणी व चांदवड या दोन शहरांसह चांदवड तालुक्यातील ४४ गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जीवन प्राधिकरणने तसे सदर गावांना कळविले आहे. तशीच परिस्थिती पालखेड धरणाची आहे. धरणात केवळ एक दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून, पिंपळगाव, ओझर, मोहाडी, जानोरी, साकोरे आदि गावांच्या पाणीपुरवठ्यात मोठी कपात करण्यात आली आहे. मात्र काहीच दिवसांत पाणीपुरवठा ठप्प होण्याची भीती आहे .
द्राक्षबागा, ऊस लागले सुकायला
धरणे, विहीर, बोअरवेल आदिंनी तळ गाठला असतानाच, पावसानेही ओढ दिल्याने तालुक्यातील शेती अडचणीत आली आहे. टँकरने पाणी देत जिवंत ठेवलेल्या द्राक्षबागांची पाने आता कमी पाण्याने सुकू लागली आहेत, तर कादवा, उनंदा, कोलवन नदीतीरी असलेले ऊसही पावसाअभावी करपू लागले आहेत. पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची पुरती झोप उडाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Four dams in Dindori are dry