परराष्ट्र धोरण चुकीचे : शिंदे
By Admin | Updated: September 26, 2016 01:11 IST2016-09-26T01:10:31+5:302016-09-26T01:11:05+5:30
परराष्ट्र धोरण चुकीचे : शिंदे

परराष्ट्र धोरण चुकीचे : शिंदे
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त बलुचिस्तानचा मुद्दा काढून पाकिस्तानला उकसवण्याचे काम केले़ केंद्र सरकारच्या चुकीच्या परराष्ट्रीय धोरणामुळे तसेच इंटेलिजन्स, मिलिटरी, पोलीस या यंत्रणांमधील असमन्वयामुळेच काश्मीरमधील उरी येथे आत्मघाती हल्ला झाल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ राज्यातील मराठा मोर्चाचे अभिनंदन करून त्यांना आरक्षण देणे शक्य असल्याचेही ते म्हणाले़
नाशिकमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, पठाणकोट हल्ल्यानंतर हा देशावरील शेवटचा हल्ला आहे असे केंद्रातर्फे सांगितले गेले होते़ यानंतर एका सैनिकाचे शिर कापून नेल्याच्या घटनेनंतर ‘एक के बदले हम दस शिर लाऐंगे’ अशीही घोषणा करण्यात आली होती़ भारताची गुप्तचर यंत्रणा सक्षम असतानाही उरीतील सैन्य दलाच्या मुख्यालयावर हल्ला होतो व १७ सैनिकांना आपले प्राण गमवावे लागतात याचा अर्थ गुप्तचर यंत्रणा, सैन्यदल, पोलीस, एजन्सी यांच्यामध्ये समन्वय नाही़ सद्यस्थितीत सुरू असलेली युद्धाची भाषा ही देशाला न परवडण्यासारखी आहे़ १९६५, १९७१ व अगदी अलीकडेच कारगील युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडल्याचे शिंदे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य
राज्यातील सर्व जिल्ह्णांमध्ये सध्या मराठा समाज आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढतो आहे़ मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र झाला ही अभिनंदनाची बाब असून, विशेष म्हणजे हे मोर्चे अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने निघत आहेत़ मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले़ अॅट्रॉसिटी कायद्याच्या बदलाबाबत बोलताना हा केंद्रसरकारचा कायदा असून, त्याचा गैरवापर रोखण्याची जबाबदारी राज्यसरकारची असल्याचे ते म्हणाले़