पशुधनासाठी असलेला चारा, मका जळून खाक
By Admin | Updated: May 4, 2016 23:28 IST2016-05-04T23:21:46+5:302016-05-04T23:28:03+5:30
अस्वली स्टेशन : ऐन दुष्काळात संकट ओढावल्याने शेतकरी हैराण

पशुधनासाठी असलेला चारा, मका जळून खाक
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात जनावरांचे पिण्याचे पाणी व चाराटंचाई समस्या उग्ररूप धारण करीत असताना वाडीवऱ्हे येथील वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे अस्वली स्टेशन येथील शेतातील गवत व मका शॉटसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांनी पाणीटंचाईवर मात करीत पशुधनासाठी शेतीद्वारे चाऱ्याची सुविधा केली आहे; मात्र पिकविलेला चारा जळून गेल्याने मुक्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अस्वली स्टेशन येथील शेतकरी उत्तम किसन दराडे त्यांच्या मळ्यातील वीजवाहक तारा एकमेकांना स्पर्श झाल्याने मोठी आग लागली यात गिनीगवत, मका जळून खाक झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शॉटसर्किटमुळे आग लागली. शेतात महिला गवत कापणी करीत असताना सदर आग लागल्याने त्यांनी आरडाओरड करताच जवळून काही शेतकरी धावून आल्याने महिलांच्या प्रसंगवधानाने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने त्यांचा प्राण वाचला.
दराडे यांनी एक एकर क्षेत्रात जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था केली होती. त्यातील वीस गुंठ्यातील गवत आगीत जळून गेल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्या शेतातील वीज वितरणचे विद्युत खांब एक दीड वर्षांपासून वाकलेल्या अवस्थेत आहे. विद्युत तारा हाताला लागतील अशा लोंबलेल्या अवस्थेत असल्याने जीवितास धोका आहे.
हे विद्युत खांब कोसळण्याच्या मार्गावर असून, ते तत्काळ बदलावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच दराडे यांच्या राहत्या घराजवळदेखील मेन लाइनीचा खांब वाकलेल्या अवस्थेत आहे. कधीही पडेल हे सांगता येत नाही. याच परिसरात त्यांची जनावरे बांधलेली असतात. त्यांच्या घरासमोरून महामार्ग जातो. तेथून शाळकरी मुलांचा, पादचारी, वाहनधारक यांचादेखील वावर असल्याने त्वरित नूतन खांब बसवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर).