लग्नतिथीच्या अंतिम टप्प्यात फुलांची टंचाई
By Admin | Updated: May 4, 2016 00:25 IST2016-05-04T00:17:08+5:302016-05-04T00:25:19+5:30
भाव तेजीत : गुलाब, मोगरा, झेंडू यांचे दर आवाक्याबाहेर

लग्नतिथीच्या अंतिम टप्प्यात फुलांची टंचाई
नाशिक : लग्नतिथीचे हातावर मोजता येतील इतकेच मुहूर्त शिल्लक असल्याने व ८ मे ही लग्नाची शेवटची तिथी असल्याने फुलांचे दर प्रचंड वाढले असून, वधू-वर पक्षाकडून फुले खरेदीसाठी हात आखडता घेतला जात असल्याचे चित्र आहे. दुष्काळ, पाणीटंचाईमुळे फुलांचे उत्पादन अवघे ४० टक्क्यांवर आले असून माल कमी, मागणी जास्त त्यामुळे भाव प्रचंड वाढले आहेत. ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करणे शक्य होत नसल्याने विक्रेतेही हवालदिल झाले आहेत. सध्या गुलाब, मोगरा, झेंडूंचे दर चौपट वाढले असून दुपारपर्यंत बहुतांशी माल संपून जात असल्याचे चित्र दिसत आहे.
नाशिकला मखमलाबाद, दरी, मातोरी, गंगापूर, अहमदाबाद (नवसारी) येथून गुलाब, झेंडू, लिली असे सर्वच प्रकारची फुले येतात. यंदा पिण्यासाठीच पाणी नसल्याने शेतीसाठी पाणी कुठून असणार अशी स्थिती आहे. त्यामुळे मुळातच फुलांचे उत्पादन घटले आहे. त्यात लग्नसराईचा अखेरचा टप्पा असल्याने फुलांना मागणी वाढली आहे. अखेरची तिथी संपल्यानंतर ९ मे ला अक्षय्यतृतीया तर २१ मे रोजी बुद्धपौर्णिमा हे दोनच महत्त्वाचे दिवस असल्याने फुलांची मागणीही घटण्याची शक्यता आहे.