पाच गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत
By Admin | Updated: July 28, 2014 23:27 IST2014-07-28T22:31:52+5:302014-07-28T23:27:20+5:30
पाच गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत

पाच गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत
नांदूरशिंगोटे : भोजापूर धरणातील कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचा उद्भव कोरडा पडल्याने योजनेचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद पडला होता. नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जेसीबीद्वारे चर खोदून मृत पाणीसाठा विहिरीत वळविल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला.
पावसाळा सुरूहोऊन दीड महिना उलटल्यानंतरही भोजापूर धरणात नवीन पाण्याची आवक झाली नाही. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिमपट्ट्यातही यावर्षी पाऊस नसल्याने म्हाळुंगी नदी
कोरडी ठाक आहे. त्यामुळे यावर्षी भोजापूर धरणात पाणी आले नाही. भोजापूर धरणातून कणकोरीसह पाच गाव व मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा राबविण्यात आल्या आहेत. पावसाळा नको तेवढा लांबल्याने भोजापूर धरणात जेमतेम पाणी शिल्लक राहिले आहे. पाणी आटल्याने कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेची विहीर कोरडी ठाक पडली होती. त्यामुळे नांदूरशिंगोटे, मानोरी व कणकोरी या गावांचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद पडला होता.
विहीर कोरडी पडल्याने मृत पाणीसाठा विहिरीत वळविणे गरजेचे होते. त्यानुसार नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक गवारे, उपसरपंच रवींद्र शेळके, कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष अनिल सांगळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्के, श्रीकांत वाघचौरे, मंगेश शेळके, पांडुरंग आगिवले, पाणीपुरवठा कर्मचारी रख्मा उघडे, अशोक गोसावी, विकास सूर्यवंशी यांनी भोजापूर धरणावर जाऊन जेसीबीच्या सहाय्याने चर खोदण्यास प्रारंभ केला.
रविवारी रात्री १० वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जेसीबीच्या सहाय्याने सुमारे ८० फूट लांबीची नाली खोदण्यात आली. त्याद्वारे मृत पाणी योजनेच्या विहिरीत वळविण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळी योजनेचा पाणीपुरवठा सुरळीत झाला.
धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून दोन पाणीयोजना कार्यान्वित आहे. त्यामुळे नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष सांगळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले आहे. (वार्ताहर)