पाच गाव नळ पाणीपुरवठा योजना बंद

By Admin | Updated: February 13, 2016 23:57 IST2016-02-13T23:13:08+5:302016-02-13T23:57:34+5:30

कृत्रिम पाणीटंचाई : बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित

Five village taps water supply scheme closed | पाच गाव नळ पाणीपुरवठा योजना बंद

पाच गाव नळ पाणीपुरवठा योजना बंद

 नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातल्या कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे सुमारे साडेतीन लाख रुपये वीजबिल थकल्याने भोजापूर धरणावरील विहिरीचा वीज पुरवठा बुधवारी खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीत नांदूरशिंगोटे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा समिती व प्रशासन यांच्यात नेहमीच समन्वयाचा अभाव असल्याने हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पाणी योजना सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नांदूरशिंगोटे गावाला नळपारी पुरवठा योजनेव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. नांदूरशिंगोटे गावात शुक्रवारपासून नळ पाणीपुरवठा बंद झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात दवंडी देऊन चार दिवस पाणी येणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे लागत आहे. कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत नांदूरशिंगोटे गावाचा समावेश आहे. भोजापूर धरणाव्यतिरिक्त परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा कोठेच स्त्रोत नसल्याने पाणी योजना बंद पडल्यास मोठी समस्या निर्माण होते. येथे आठ हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. वाड्या-वस्त्यांनाही नळ पाणीपुरवठा योजनेतूनच पाणी दिले जात आहे. परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ व सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये येथे आहेत. त्यामुळे नोकरदार वर्ग, हॉटेल व्यावसायिक तसेच स्थानिक कुटुंबानाही पाणीपुरवठा योजना बंद असल्यास पाणी विकत घ्यावे लागते. योजनेत नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीची नेहमीच अग्रेसर भूमिका असते. पंचायतीची ठरलेली रक्कम नियमित असतानाही येथील ग्रामस्थांना नेहमीच पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कणकोरीसह पाच गाव पाणी योजनेत नांदूरशिंगोटे, मानोरी, कणकोरी, मऱ्हळ बुद्रुक, मऱ्हळ खुर्द आदि गावांना भोजापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक गावाला दर महिन्याची पाणीपट्टी ठरवून देण्यात आली आहे. परंतु, वेळेवर नियोजन होत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने योजनेतील गावांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा समिती, सरपंच, पदाधिकारी व प्रशासन यांच्यात नेहमीच समन्वयाचा अभाव असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीज पंप नादुरुस्त झाल्यानंतरच त्याकडे बघितले जाते.
(वार्ताहर)

Web Title: Five village taps water supply scheme closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.