बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार
By Admin | Updated: April 24, 2016 00:35 IST2016-04-23T23:46:05+5:302016-04-24T00:35:58+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार

बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार
निफाड : तालुक्यातील कुरडगाव येथे शुक्र वारी रात्री बिबट्याने हल्ला करत तब्बल पाच शेळ्या ठार झाल्याची घटना घडली.
निफाड - कुरडगाव रस्त्यावर रतन एकनाथ चकोर यांचे शेत असून, सालकरी भाऊराव विश्वनाथ माळी शेतातील खोलीत राहतो. माळी यांच्या एकूण पाच मोठ्या शेळ्या घराबाहेर दररोज बांधलेल्या असतात. दररोज रात्री माळी कुटुंबीय घराबाहेर शेळ्यांच्या बाजूला झोपतात. शुक्रवारी रात्री ११ पर्यंत माळी कुटुंबीय घराबाहेर बसलेले होते. शुक्रवारी माळी कुटुंब रात्री ११ नंतर घरात झोपले आणि बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला करत पाच शेळ्या ठार केल्या. माळी उठल्यानंतर घराबाहेर तीन शेळ्या मृतावस्तेत आढळल्या. माळी यांच्या एकूण पाच शेळ्यांपैकी तीन शेळ्यांवर बिबट्यांनी हल्ला करून ठार केले व त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र शेळ्या बांधलेल्या असल्याने बिबट्यांनी इतर दोन शेळ्याकडे आपला मोर्चा वळवत त्यांना ठार करून ओढत पश्चिम बाजूला काही अंतरावर असलेल्या उसात नेले. ओढून नेल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या.
सदर घटना येवला वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनरक्षक विजय टेकनर आणि वनकर्मचारी दिलीप अहिरे तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. यापूर्वीही बिबट्याने निफाड-कुरडगाव रस्त्यावर बोडके आणि सांगळे वस्तीजवळ काही दिवसाच्या अंतराने दोन मोटरसायकलचा पाठलाग करून मोटारसायकलस्वार दोन महिलांना जबर जखमी केले होते. (वार्ताहर)