सुकेणे रस्त्यावर सात दिवसांत पाच अपघात

By Admin | Updated: July 10, 2014 01:06 IST2014-07-09T21:20:13+5:302014-07-10T01:06:34+5:30

सुकेणे रस्त्यावर सात दिवसांत पाच अपघात

Five accidents in seven days on the dry road | सुकेणे रस्त्यावर सात दिवसांत पाच अपघात

सुकेणे रस्त्यावर सात दिवसांत पाच अपघात

कसबे सुकेणे : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेजबाबदार कारभारामुळे ओझर ते सुकेणे या प्रमुख जिल्हा मार्गावरील अपघाती वळणांवर एकाच आठवड्यात तब्बल पाच अपघात झाले आहेत. यामुळे सुकेणे परिसरात संताप व्यक्त होत असून, या वळणांवरील अर्धवट असलेली कामे पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाव्दारे केली आहे.
ओझर ते सुकेणे रस्त्यावरील वाहतुकीत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ओझर व दिंडोरी भागातून जाणारी सर्व प्रकारची अवजड व प्रवाशी वाहने येवला, औरंगाबादकडे याच मार्गाने जातात. तसेच निफाड, कसबे सुकेणे, ओझर अशी तीन मोठी बाजारपेठांची गावे याशिवाय पिंपळस रामाचे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, दीक्षी, शिलेदारवाडी ही गावेही परस्परांना जोडली जात असल्याने या रस्त्यावरील वाहतुकीत झपाट्याने वाढ झाली आहे. या रस्त्याचे रुंदीकरण सोळा वर्षांपूर्वी स्व. आमदार रावसाहेब कदम यांच्या कार्यकाळात झाले होते. वाहनांची संख्या पाहता हा रस्ता सुरक्षित होता. परंतु अलीकडच्या सात ते आठ वर्षांपासून या मार्गावरील वाहतुकीत प्रचंड वाढ झाली असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. जनार्दन पर्णकुटीजवळ रस्त्याच्या वळणावर बाणगंगा नदीपात्राच्या बाजूने संरक्षण भिंत बांधण्यात आली, मात्र रेलिंग व रेडिअम व कलर पट्ट्यांचे काम ठेकेदार अर्धवट सोडून गेल्याने हे काम तसेच रेंगाळले असून, सुमारे एक कोटी रुपये खर्च करून केलेले डांबरीकरण निकृष्ट झाले असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, भीमराव बोराडे, कसबे सुकेणे येथील बबन शेवकर यांनी निवेदनाव्दारे कळविले आहे. थेरगाव गावाजवळ असलेल्या नाल्याच्या मोरीची दोन्हीही बाजूने पडझड झाली आहे. याबाबतही बऱ्याचवेळा निवेदने दिली तरीही दखल घेतली जात नसल्याचे प्रवीण जाधव यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात झालेल्या पाच अपघातातही गंभीर इजा पोहोचल्याने एकास जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत तातडीने उपाययोजना करून अपघाती वळणांवर, गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारून फलक लावावेत. वाहतुकीत अडसर असलेली झाडेझुडपे काढावीत तसेच थेरगाव मोरीची दुरुस्ती करावी, मौलाना बाबा दर्गा, दात्याणे-दीक्षी या टप्प्यातील खड्डे बुजवावेत, जनार्दन पर्णकुटीजवळील रस्ता संरक्षण रेलिंगचे काम पूर्ण करून रेडिअम व पांढरे पट्टे मारण्याची मागणी करण्यात आली आहे. दखल न घेतल्यास आंदोलनचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.(वार्ताहर)

सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष असून, हा रस्ता मृत्यूचा साफळा बनला आहे. संबंधितांनी दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- अर्जुन बोराडे
जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

थेरगाव मोरी अतिशय धोकेदायक झाली आहे. संबंधितांना अनेक वेळा सांगूनही दखल घेतली जात नाही.
- प्रवीण जाधव, कसबे सुकेणे

Web Title: Five accidents in seven days on the dry road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.