ग्रामसेवकांमधील ‘वैष्णव’ शोधून निलंबित करा
By Admin | Updated: August 12, 2014 02:01 IST2014-08-12T01:42:05+5:302014-08-12T02:01:51+5:30
ग्रामसेवकांमधील ‘वैष्णव’ शोधून निलंबित करा

ग्रामसेवकांमधील ‘वैष्णव’ शोधून निलंबित करा
नाशिक : दीड कोटीची कामे परस्पर मंजूर करणाऱ्या आरोग्य विभागातील चंद्रकांत वैष्णव याच्यावर ज्याप्रमाणे तत्परतेने निलंबनाची कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे नाशिक तालुक्यातील बऱ्याचशा ग्रामपंचायतींनी बिनशेती कर देयक न बजावल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, या प्रकरणी दोषींवर कारवाईचा पंचायत समितीचा ठरावही झाला आहे. अशा दोषी ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पंचायत समिती सभापती अनिल ढिकले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना दिले आहे.
विशेष म्हणजे, या पत्रातच तालुक्यातील गंगाम्हाळुंगी, गोविंदपूर, शास्त्रीनगर, गणेशगाव (त्र्यंबकेश्वर), कश्यपनगर येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण सोडून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित ग्रामसेवकांवरही निलंबनाची कारवाई करण्याची मागणी ढिकले यांनी केली आहे. याच ठरावानुसार ग्रामपंचायतींनी बिनशेती कर (एन.ए) देयक न बजावल्यामुळे ग्रामपंचायतींचे व पर्यायाने शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा सर्वच कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सभापती अनिल ढिकले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
निवडणूक याचिकेवर २२ पासून सुनावणी
नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत अंतिम सुनावणी येत्या २२ आॅगस्टपासून होणार असल्याची माहिती अॅड. शिवाजी सहाणे यांनी दिली.ंविधान परिषदेच्या निवडणुकीत सहाणे आणि राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांच्यात लढत झाली. त्यात समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले.
त्यासंदर्भात अॅड. सहाणे यांनी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता २२ आॅगस्टपासून अंतिम सुनावणी होणार असून, याचिकाकर्ते तसेच प्रतिवादी अंतिम युक्तिवाद करणार आहेत.