..अखेर ‘तो’ अपहृत परतला
By Admin | Updated: August 17, 2016 23:49 IST2016-08-17T23:48:44+5:302016-08-17T23:49:20+5:30
अपहरण नाट्यावर पडदा : अभ्यासाच्या दबावापोटी सोडले होते घर

..अखेर ‘तो’ अपहृत परतला
घोटी : गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झालेल्या एका शाळकरी मुलाच्या अपहरण नाट्यावर पडदा पडला असून, अपहृत मुलगा आज दुपारी स्वत: हून घरी परतला आहे.
घोटी येथील दुर्गानगर भागात भगवंत मंजूभार मल हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा उमेशनामक मुलगा घोटीतील जनता विद्यालयात दहावीत शिकत असून, तो सोमवारी ध्वजारोहण आटोपल्यानंतर शिकवणीसाठी जात असताना अज्ञात इसमाने त्याला फूस लावून त्याचे अपहरण केले असल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी घोटी पोलीस ठाण्यात दिली होती.
अभ्यास करण्यासाठी आई-वडिलांचा सातत्याने दबाव आणत असल्याने व्यथित झालेल्या उमेशने सोमवारी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. यानुसार तो घोटी ते इगतपुरी असा रिक्षाने प्रवास करून पुढे रेल्वेने मुंबईत दादर येथे पोहोचला. रात्रभर रेल्वेस्थानकावर झोपून तो लोकलने कसाऱ्यापर्यंत आला व पुढे पॅसेंजर गाडीने घोटीत आला. दरम्यान, आपले कोणीही अपहरण केले नसून आपल्यावर अभ्यासासाठी होणाऱ्या दबावापोटी पलायन केल्याचे उमेश भारमल याने पोलिसांनी चौकशीदरम्याने सांगितल्याने अपहरण नाट्यवर अखेर पडदा पडला आहे. (वार्ताहर)