बिलपुरीच्या साडेतीनशे ग्रामस्थांचे उपोषण
By Admin | Updated: September 8, 2016 00:56 IST2016-09-08T00:56:02+5:302016-09-08T00:56:11+5:30
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बिलपुरीच्या साडेतीनशे ग्रामस्थांचे उपोषण
सटाणा : तालुक्यातील गोराणे येथील सविता देसले हिचा घातपात केला असताना अपघात झाल्याचे दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपअधीक्षकांसह जायखेडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षका विरु द्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी बुधवार पासून विवाहितेच्या माहेरच्या बिलपुरी येथील साडे तीनशे कुटुंबीयांनी पाणी,अन्नाचा त्याग करून राम मंदिराजवळ आमरण उपोषण सुरु केले आहे.
तालुक्यातील गोराणे येथील विवाहिता सविता देसले (२७) ही विवाहिता गेल्या २५ जुलै रोजी बिलपुरी येथे माहेरी गेली होती. दुसऱ्या दिवशी रात्री पती अरविंद श्रावण देसले याच्या सोबत मोटरसायकलने गोराणेकडे येत असतांना अंधाराचा फायदा घेत आसखेडा शिवारात अरविंदने लोखंडी सळईने सविताच्या डोक्यात वार करुन खून केला होता.असे असतांना अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर व पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांची भेट घेऊन सत्य घटना सांगून खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सविताच्या नातेवाईकांनी केली होती.मात्र दोन्ही अधिकाऱ्यांनी हा घातपात नसून अपघातच असल्याचे ठासून सांगत अरविंद देसले याला पाठीशी घातले आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त बिलपुरीच्या ग्रामस्थांनी खून करणाऱ्या आरोपीला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात बागलाण तहसील कार्यालयावर हल्लाबोल केला होता.
दरम्यान सहा दिवस उलटूनही संबधित दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई न झाल्याने आज बुधवार पासून बिलपुरी येथील सुमारे साडे तीनशे कुटुंबीयांनी गावातीलच राम मंदिराच्या चौकात अन्न ,पाण्याचा त्याग करून आमरण उपोषण सुरु केले आहे. संबधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होत नाही आणि सविताला न्याय मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.