फेरीगणिक वाढत गेला युतीचा जल्लोष निकाल : राष्ट्रवादीचा काढता पाय; मनसेना गायब
By Admin | Updated: May 17, 2014 00:17 IST2014-05-17T00:01:39+5:302014-05-17T00:17:20+5:30
नाशिक : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम ठेवली. प्रत्येक फेरीगणिक आघाडी मिळत गेल्यामुळे महायुतीचा जल्लोष वाढत गेला.

फेरीगणिक वाढत गेला युतीचा जल्लोष निकाल : राष्ट्रवादीचा काढता पाय; मनसेना गायब
नाशिक : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम ठेवली. प्रत्येक फेरीगणिक आघाडी मिळत गेल्यामुळे महायुतीचा जल्लोष वाढत गेला.
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अटीतटीची निवडणूक झाल्याने खरोखरीच अंदाज बांधणे कठीण झाले होते. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला आव्हान दिले जाऊ शकते यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता; परंतु मतमोजणीत पहिल्या फेरीत हेमंत गोडसे यांनी ७ हजार १०९ मतांची आघाडी घेतली आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला. दुसर्या फेरीत आणखी सहा हजार मतांची आघाडी गोडसे यांनी घेतली. तथापि, गोडसे यांनी पन्नास हजारांचे मताधिक्य पार करेपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांना साशंकता होती. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनादेखील सुरुवातीला मिळालेले मताधिक्य अपेक्षित वाटत होते. सुरुवातीला ज्या मतदान केंद्रावरील मतांची मोजणी झाली ते भाजपाला अनुकूल असल्याचे सांगितले जात होते. भुजबळ यांच्या सोयीच्या मतदान केंद्रांची मोजणी सुरू झाली म्हणजे मताधिक्यावर ते मात करतील, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. परंतु तशी वेळ आली नाही. प्रत्येक फेरीगणिक गोडसे यांचे मताधिक्य वाढत गेले आणि कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला. मतमोजणीच्या ठिकाणी आणि केंद्राच्या बाहेरही प्रत्येक फेरीगणिक कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत गेला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शहराध्यक्ष अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, मनपातील विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
एकीकडे ही अवस्था असताना, दुसरीकडे मात्र कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ होत होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नाना महाले, शहराध्यक्ष शरद कोशिरे, दिलीप खैरे, समाधान जाधव, विनायक खैरे यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी विजयाची आशा सोडून दिली आणि मतदान केंद्र सोडले. सुनील बागुल आणि त्यांचे कायर्कर्ते विलंबाने बाहेर गेले. या सर्व धावपळीत मनसेचे आमदार वसंत गिते किंवा अन्य आमदार, पदाधिकारी कोणीही मतमोजणी केंद्राकडे फिरकले नाहीत. त्यामुळे ते निकाल अगोदरच जाणून होते की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. अन्य अनेक पक्षांचे पदाधिकारीदेखील मतदान केंद्रांकडे फिरकले नाहीत.