खरिपाची पिके वाया जाण्याची भीती

By Admin | Updated: September 6, 2016 22:04 IST2016-09-06T22:03:36+5:302016-09-06T22:04:17+5:30

पावसाची दडी : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील बळीराजा हवालदिल; जनावरांच्या चाऱ्यासाठीही कसरत

Fear of being lost to Kharif crops | खरिपाची पिके वाया जाण्याची भीती

खरिपाची पिके वाया जाण्याची भीती

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वटार परिसरात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. सुरुवातीला चांगल्या प्रकारे पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
खरिपातील मका, बाजरी ही पिके अत्यंत केविलवाणी अवस्थेत आहेत. सुरुवातीला चांगला पाऊस जरी झाला तरी आता पिके उम्रावर आहेत. पावसामुळे पिकांची वाढही खुंटली आहे. उत्पादनात पन्नास टक्क्यांची घट तर होणार आहेच; परंतु चार ते पाच दिवसात पुरेसा पाऊस झाला नाहीतर फक्त जनावरांसाठी चारा गोळा करावा लागणार आहे.
आठ दिवसांपासून तपमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन उष्णतेचे प्रमाण वाढल्याने पावसाळा की उन्हाळा, असा प्रश्न पडला आहे.
पाण्यासाठी मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जंगलात जनावरांना चारा नाही, पाणी नाही स्थलांतर करण्याची वेळ आली
आहे; पण स्थलांतर करून जायचं कुठं कारण कोठेच पाणी नाही.
मेंढपाळ करणारे दुहेरीत संकटात सापडले असून, चाऱ्यासाठी वणवण भटकंती करूनही चारा व पाणी मिळत नाही.
मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी बऱ्यापैकी सुरुवातीला पाऊस पडला; पण सर्व पाणी वाहून गेल्याने जमिनीत पाणी जिरलेच नाही त्यामुळे विहिरींनीही तळ गाठला. एकेकाळी पाण्यासाठी प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या वटार परिसरात पिण्याच्याही पाण्याची भ्रांत पडली आहे.
भरवशाचे पीक समजले जाणारे कांदा पिकाला बाजार नसल्याने चाळीतच कांदा सडला आहे. थोड्याफार प्रमाणात शिल्लक राहिलेला कांदा मातीमोल भावात बळीराजाला विकावा लागत आहे. परिणामी गरीब शेतकरी अधिकच गरीब होत राहील.
परिसरातील शेती व शेतकरी धोक्यात आला असून, शेतकरी व शेतमजुराला काम नाही. दोघांवरही उपासमारीची वेळ आली
आहे.
पावसाळी कांदा लागवड करणारा शेतकरी पाणी नसल्याने शांत बसला आहे. काही शेतकऱ्यांनी कोबी व टमाटा पिकाची लागवड केली. कोबी पिकावर करपा, पाकोळी, तुडतुडे आदि रोगांनी आक्रमण केल्याने हातातोंडाशी आलेला घास गेला. सततचा कमकुवत होत चाललेला पावसाळा बळीराजाला दिवसेंदिवस गरीबच बनवत चालला आहे.
परिसरातन डाळींबबागांवर तेल्या रोगाने आक्रमण केल्याने डाळिंबबागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. महागडी फवारणी करूनही डाळिंबाची रोगराई थांबत नसल्याने शेतकरी बागा उपटून टाकत आहेत. साततच्या दुष्काळाची झळ सोसणारा बळीराजाला या वर्षीतरी तरी खरिपाच्या पिकांची साथ मिळेल का याबाबत शंका वाटत आहे. (वार्ताहर)

Web Title: Fear of being lost to Kharif crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.