शेतकऱ्यांचे गणित कोलमडले

By Admin | Updated: December 7, 2015 22:51 IST2015-12-07T22:49:48+5:302015-12-07T22:51:06+5:30

कांदा भाव कोसळले : किमान दोन हजार रुपये क्विंटल भाव देण्याची मागणी

Farmers' math collapsed | शेतकऱ्यांचे गणित कोलमडले

शेतकऱ्यांचे गणित कोलमडले

 येवला : बाजार समितीत सोमवारी बारा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यातमूल्य प्रतिटन ७०० डॉलर केल्यामुळे निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी कमी झाल्याने कांद्याचे भाव ६०० ते १४९६ रुपयांपर्यंत घसरले आहे. सर्वसाधारण कांद्याला ११०० रुपयांचा दर मिळू लागल्याने शेतकरीवर्गाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुष्काळी परिस्थितीत टॅँकरने पाणी आणून जगवलेला खरिपातील पोळ कांदा कवडीमोल विकावा लागत असल्याने बळीराजाच्या डोळ्याला पाणी आणत आहे. कांद्याला किमान दोन हजार रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळावा, अशी अपेक्षा कांदा उत्पादक व्यक्त करत आहे.
उन्हाळ कांद्याचे ४२२८ हेक्टर पीक पाण्याअभावी धोक्यात आले असून, येवल्याचे सरासरी पर्जन्यमान ४८९ मि.मी. इतके कमी आहे. यंदा पाऊस फक्त ३२४ मि.मी. झाला. मुळात पाऊसच ६६ टक्के, त्यातही तो संपूर्ण पावसाळ्यात फक्त मोजकेच दिवस आणि तेही पश्चिम पट्ट्यात पडला. पाणी अडविण्याची आणि जिरविण्याची कोणतीही सोय नसल्याने एक थेंबही पाणी अडवले गेले नाही. त्यामुळे आज तालुक्यातील सर्व नद्या-नाले व सुमारे ३०० च्या वर सीमेंट नाला बांध कोरडे झाले आहेत.
आॅक्टोबरमध्ये का होईना पाऊस पडेल आणि पालखेड कालव्याचे रब्बी आवर्तन येईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याचे महागडे उळे घेऊन उपलब्ध पाण्यात शेतकऱ्यांनी रोपे तयार केली. पालखेड कालव्याच्या रब्बीच्या आवर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने पाण्याअभावी रोपे गेलीत. ज्यांच्याकडे तयार रोपे होती त्यांनी रोपे विक्रीला काढली.
तालुक्यातील टंचाईग्रस्त गावात राबविलेली जलयुक्त शिवार योजना अयशस्वी ठरल्याचे चित्र आहे. ७८ हजार हेक्टर जमिनीवर खरीप यंदा वाया गेला आहे.
पाणी आवर्तनाची आशा मावळली
येवल्यातील रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याच्या शेतीला जीवदान मिळावे यासाठी पालखेड धरण समूहातून पाणी द्यावे, अशी आशा असली तरी पालखेड धरण समूहात यंदा ४७ टक्के साठा आहे. सर्व पाणीसाठा बिगर सिंचनासाठी आधीच आरक्षित करण्यात आला आहे. धरण समूहातील पालखेड, वाघाड व करंजवण धरणातील पाणी शासनमान्य पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठीच देण्याचेच निश्चित आहे. त्यामध्ये येवला नगरपालिका येवला ३८ गावे, मनमाड नगरपालिका, मनमाड रेल्वे, एचएल, ओझर, जानोरी, पिंपळगाव, विंचूर, लासलगाव, येवला प्रासंगिक, पालखेड ५ गांवे योजना आदि योजनांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यासाठी संपूर्ण २३७८ दलघफू पाणी आरक्षित असून, पालखेड धरणामध्ये बाष्पीभवन, नदी मार्गव्यय वजा जाता निव्वळ उपयुक्त साठा २४७२ दलघफू आहे. त्यामुळे कालव्यावरील शासन मान्य बिगर सिंचन योजनासाठी दोन वेळेस व कालव्यालगतच्या ९६ कि.मी.पर्यंतच्या गावांसाठी प्रासंगिक एक वेळेस पाणी देण्याचे नियोजन आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाईसदृश परिस्थितीमुळे २३७८ दलघफू पाणी राखून ठेवल्याने सिंचनासाठी पाणी देणे अशक्य आहे.
आॅगस्ट महिन्यात कांद्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. त्यामुळे बाजारभाव अवाजवी वाढले होते. यामुळे केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यातमूल्य प्रतिटन ४५० डॉलरवरून ७०० डॉलर केल्यापासून निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. परंतु सद्यस्थितीत खरीप हंगामातील कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्र ीस येत असल्यामुळे कांद्याचे बाजारभाव तीन हजारावरून एक हजार ते १२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती राहिल्यास कांदा बाजारभाव आणखी खाली येण्याची शक्यता आहे. त्याकरिता देशातील कांदा बाहेरील देशात निर्यात करण्यासाठी कांद्याचे निर्यातमूल्य पूर्णत: हटवून कांद्याची निर्यात अधिकाधिक होईल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Farmers' math collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.