बागलाणला शेतकऱ्यांचे उपोषण
By Admin | Updated: June 27, 2014 00:16 IST2014-06-26T20:54:50+5:302014-06-27T00:16:31+5:30
बागलाणला शेतकऱ्यांचे उपोषण

बागलाणला शेतकऱ्यांचे उपोषण
सटाणा : बागलाण तालुक्यात यावर्षी प्रारंभापासून अवकाळी पाऊस व गारपिटीने बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे करताना महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला. परिणामी तालुक्यातील अनेक शेतकरी आजही पंचनाम्याबरोबरच आर्थिक लाभापासून वंचित आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ मिळावा यासाठी बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणास प्रारंभ केला आहे.
बागलाण तालुक्यातील मुंजवाड व खमताणे येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणाला प्रारंभ केला आहे़ तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे ६३ कोटी रुपयांची शासनाने आर्थिक मदत केलेली असली तरी, कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करताना अत्यंत चुकीचे व दिशाभूल करणारे पंचनामे केले आहेत. नुकसान झालेले व बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवून धनदांडग्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिल्याचे या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच तलाठी, ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष शेतावर येण्याऐवजी घरी अथवा कार्यालयात बसून पंचनामे दाखविलेले आहेत. परिणामी बाधित शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहेत.
या सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तालुक्यातील प्रांताधिकारी व तहसीलदारांसह कृषी अधिकाऱ्यांनी वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे पुनश्च पंचनामे करून आर्थिक लाभ मिळवून देत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे. या उपोषणात राहुल सोनवणे, धर्मा नंदळे, शकुंतला बागुल, रामदास बागुल, जयवंत वाघ, अनिल इंगळे, सुशीलाबाई सूर्यवंशी, त्र्यंबक बिरारी, भाऊसाहेब पवार, सतीश सावकार, संजय धाबळे, केदा सोनवणे, नामदेव जाधव, विश्वास सोनवणे, वसंत सावकार, दौलत सावकार, एकनाथ जाधव आदिंसह असंख्य शेतकरी सहभागी आहेत. (वार्ताहर)